मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर अवघ्या ४८ मतांनी पराभूत झाले आहेत. मात्र, या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटातील नेते सातत्याने यावरून निवडणूक अधिकारी, मुख्यमंत्री आणि भाजपावर टीका करत आहेत. संजय राऊत म्हणाले, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकाल हा देशभरातील सर्व निकाल प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्यांपैकी एक आदर्श घोटाळा आहे. भाजपा आणि त्यांच्याबरोबरच्या टोळ्यांनी देशभरातील काही मतदारसंघांमध्ये चुकीच्या मार्गाने विजय मिळवला आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघ हे त्यातलं आदर्श उदाहरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला निकाल हा वादग्रस्त आहे. त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना दोन वेळा विजयी घोषित केलं. त्यानंतर तिथल्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांना एक फोन येतो… त्यापाठोपाठ दुसरा एक निवडणूक अधिकारी फोन घेऊन मतमोजणी ज्या ठिकाणी चालू आहे तिथे जातो… त्या फोनवर ओटीपी येतो किंवा त्या फोनद्वारे ईव्हीएम मशीन अनलॉक होतं, अथवा त्याच्याशी काहीतरी छेडछाड करता येते… रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मतमोजणीच्या ठिकाणी तो फोन फिरत होता… हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. यावर वंदना सूर्यवंशी यांनी आक्षेप घेतला नाही. आम्ही आक्षेप घेतल्यानंतर वायकरांच्या नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांचा फोन जप्त करण्यात आला. वनराई पोलिसांनी तो फोन जप्त केला. मात्र, तो फोन पोलिसांकडून परत मिळवण्याचा गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न चालू आहे. वायकरांचा जवळचा माणूस, एक निवृत्त पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्याने गेल्या वनराई पोलीस ठाण्यात येरझरे मारत आहे.

राऊत म्हणाले, देशभर असे ४० ते ४५ मतदारसंघ आहेत, जिथे एनडीएचा उमेदवार १०० ते १००० मतांनी जिंकला आहे. ते निकाल भाजपावाल्यांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर ते भाजपाच्या बाजूने वळवले. उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघ हे त्यातलं एक आदर्श उदाहरण आहे.

ठाकरे गटाचे खासदार म्हणाले, ईव्हीएम मशीनबाबत आम्ही आरोप केले नाहीत. ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं असा दावा उद्योगपती एलॉन मस्क यांनी केला आहे. आम्ही केवळ उत्तर पश्चिम मतदारसंघात झालेल्या घोटाळ्यावर बोलत आहोत. आधी अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित केलं. त्यानंतर पोस्टल बॅलेटची मतं बेकायदेशीरपणे मोजून वायकर यांना विजयी केलं. त्यामुळे आता आमची मागणी आहे की रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून रोखावं.

हे ही वाचा >> “४ जून रोजी अमोल कीर्तिकर जिंकले होते, यापुढची लढाई आम्ही..”, आदित्य ठाकरेंची गर्जना

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की “असा कुठलाही घोटाळा झाला नाही. तसेच ईव्हीएम मशीन हॅक होत नाही”. शिंदेंच्या या वक्ताव्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत म्हणाले “हा शिंदे कोण आहे? तो एलॉन मस्कचा बाप आहे का?

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut asks is eknath shinde samrter than elon musk in technology asc