Sanjay Raut On Manikrao Kokate : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावल्याचं पाहायला मिळालं आहे. नाशिक दौऱ्यावर असताना एका शेतकऱ्याने कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला असता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी उलट जाब विचारत त्या शेतकऱ्याला सुनावलं. ‘कर्ज घेता आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, कर्जमाफीच्या पैशांनी काय करता?’, असा जाब कोकाटे यांनी विचारला. दरम्यान, कोकाटे यांच्या या विधानावरून खासदार संजय राऊतांनी त्यांना चांगलंच सुनावलं. ‘माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा आहेत’, असं म्हणत राऊतांनी कोकाटेंवर टीका केली.

संजय राऊत काय म्हणाले?

“माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत. खरं म्हणजे माणिकराव कोकाटे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांनी अशा प्रकारची विधाने करू नयेत. शेतकऱ्यांना दुखवणारी विधाने केली नाही पाहिजे. अजित पवार यांनी प्रफुल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्या सारख्या लोकांना लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही. या तिघांचे भाषण जर तुम्ही ऐकलं तर कॉमेडी शो सुरु केलेले दिसत आहेत”, अशा खोचक शब्दांत संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना टीका केली.

“अजित पवार कॉमेडी शो करत आहेत असं नाही, तर त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा कॉमेडी शो, दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रोज शेतकऱ्यांची टिंगल करतात, खिल्ली उडवतात. या राज्यात काय चाललंय? आरोग्य विभागात काम व्यवस्थित सुरु नाही, कृषी खात्यात व्यवस्थित काम सुरु नाही. गृहखातं तर कोसळून गेलंय”, असं म्हणज संजय राऊत यांनी महायुतीवर टीका केली.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की कर्जमाफी होऊ शकत नाही? मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही? असा सवाल एका शेतकऱ्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या शेतकऱ्यालाच सुनावल्याचं पाहायला मिळालं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की, “मग जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बरं कर्ज भरावं? कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत कर्जभरायच नाही”, असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं.

“मला एक सांगा, आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही. पण तुम्ही मला सांगा. तुमची (शेतकऱ्यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे. सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे, सिंचनासाठी पैसे, शेततळ्यासाठी पैसे देणार आहे. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात, पीक विम्याचे पैसे पाहिजे, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा”, असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं आहे.