अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. असं असलं तरी या सोहळ्याचा उत्साह सोशल नेटवर्किंगवरही दिसून येत आहे. ट्विटवरील सर्वच्या सर्व टॉप ११ ट्रेण्ड हे अयोध्या राम मंदिरासंदर्भातील आहे. अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनीही यासंदर्भातील ट्विट केले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात एक ट्विट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत यांनी कोणताही कॅप्शन न देता सकाळी दहा वाजता एक फोटो ट्विटवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राम मंदिर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भातील मजकूर आहे. फोटोमध्ये भगवा झेंडा असणारा राम मंदिराचा घुमट दिसत आहे. भगव्या रंगाच्या या पोस्टकार्डमध्ये श्री असं अक्षर लिहिण्यात आलं आहे. मात्र श्रीवरील वेलांटीऐवजी तिथे शिवसेनेचे चिन्ह असणारं धनुष्यबाण दाखवण्यात आला आहे. श्री या अक्षराच्या बाजूला, “बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती” असं लिहिण्यात आलं आहे. फोटोच्या तळाशी, “गर्व से कहो हम हिंदू है” असं वाक्य आहे.

बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे येऊन या घटनेची जबाबदारी घेतली होती. त्यांच्या भूमिकेवरुन देशभरात वादळ उठलं होतं. मात्र या घटनेनंतर शिवसेना या पक्षाची हिंदुत्ववादी संघटना ही ओळख समोर आली. गर्वसे कहो हम हिंदू है हा बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला नारा याच काळातला होता. त्यामुळे अयोध्या प्रकरण आणि बाळासाहेब ठाकरे यांचं एक अनोखं नातं होतं. त्यामुळेच प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारण्यासाठी जे भूमिपूजन केलं जातं आहे त्या ठिकाणी शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाची माती घेऊन उपस्थित झाले आहेत.

बाबरीसंदर्भात काय म्हणाले होते बाळासाहेब

बाबरी मशीद पाडल्यानंतर बाळासाहेबांनी अगदी रोखठोक भूमिका घेतली होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेली. सकाळी दहाच्या सुमारास लाखांच्या संख्येत येथे कारसेवक जमले होते. त्यानंतर देशात प्रचंड सांप्रदायिक दंगेही उसळलेले बघायला मिळाले होते. अयोध्येत झालेल्या या घटनेनंतर बाळासाहेबांनी नेहमीच्या शैलीत यावर भूमिका मांडली होती. “साडेतीन हजार हिंदूंची देवळ पाडण्यात येऊन त्यांच्या मशिदी बांधण्यात उभ्या राहिल्या. साडेतीन हजार. आम्ही काय म्हणतो आम्हाला साडेतीन हजार मशिदी पाडायच्या नाहीत. आम्हाला आमच्या फक्त तीन मशिदी द्या. बाबरी जी पडली. दोन पाडायच्या आहेत आणि ती काशी आणि मथुरा. बाकी ठेवा तुमच्याकडे. घाला लोटांगण,” असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.“बाबरी पाडली ही गौरवाचीच गोष्ट आहे. त्यात लाजण्यासारखं काही नाही. बाबरी मशीद पाडली गेली, कारण त्या खाली राम मंदिर होतं. इतिहास असं म्हणतो की, बाबरानं हिंदू देवळं पाडली. आता आम्ही स्वतंत्र झालो आहोत, मशिदीच्या जागी देवळं उभी करू, यात मुस्लिमांनी सहभागी व्हायला,” असंही बाळासाहेब इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut posted a special photo remembering shivsena leader balasaheb thackeray on ram mandir bhumi pujan day scsg