Bhaiyyaji Joshi on Marathi Language : “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे”, असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. यावर आता विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. तर, सरकारमधील कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “भाजपावाल्यांचे वरिष्ठ नेते मुंबईत येतात आणि मुंबईची भाषा मराठी नाही असं सांगतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे दोन मिंधे आणि इतर मंत्रिमंडळाने हे वक्तव्य सहनच कसं केलं? मुंबईत कोणीही कुठलीही भाषा बोलू शकतो कारण या शहराची भाषाच नाही असं जोशी यांचं म्हणणं आहे. जोशी म्हणाले आहेत की घाटकोपरची भाषा गुजराती आहे. अमूक-तमूक भागाची अमुक-तमूक भाषा आहे, मराठी नाही. हेच वक्तव्य ते कोलकाता, लखनौ, चेन्नई, लुधियाना, बंगळुरू किंवा पाटण्यात जाऊन करू शकतात का?”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “लखनौची भाषा हिंदी नाही, कोलकात्याची भाषा बंगाली नाही, चेन्नईची भाषा तमिळ नाही असं भैय्याजी जोशी त्या-त्या शहरांत जाऊन बोलू शकतात का? ते केवळ महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईत येऊन म्हणतात की मुंबईची भाषा मराठी नाही, गुजराती आहे. मुंबईत मराठी भाषा येण्याची गरज नाही. कारण इथे मिंध्यांचं सरकार आहे. राज्य सरकार सांगतं की मराठी ही आमची राजभाषा आहे. ही जर राजभाषा असेल तर त्या भाषेविरोधात केलेलं भैय्याजी जोशींचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं. १०६ हुतात्म्यांनी मुंबईसाठी, मराठीसाठी बलिदान केलं. त्यांनी आजचं हे वक्तव्य ऐकण्यासाठी आपले प्राण अर्पण केले होते का?”

संजय राऊतांचा संताप

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “या सरकाला थोडा स्वाभिमान असेल, मराठीचा अभिमान असेल, तर जोशींच्या वक्तव्याची निंदा करावी. या लोकांनी (महायुती सरकार) राज्यगौरव दिन सुरू केला आहे. तिथे गौरव गीत गातात, मराठी भाषेचा राजकीय कार्यक्रम करतात, शोबाजी करतात, मात्र त्यांच्या पक्षाचे नेते, त्यांचे विचारधारावाहक मुंबईची भाषा मराठी नाही असं सांगतात, हा मराठी माणसाचा अपमान नाही का? हा मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाचा अपमान नाही का? ही भाजपाची, राज्यातील महायुती सरकारची अधिकृत भूमिका आहे की नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं. आज विधीमंडळात भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याची निंदा करावी. त्याचा ठराव पास करावा.”

“…तर तुमच्या दुधात भेसळ आहे”

संजय राऊत म्हणाले, “भैय्याजी जोशींनी जे वक्तव्य केलंय त्यावरून राज्य सरकारने त्यांचा धिक्कार करावा. विधीमंडळात निंदा ठराव मांडावा. तुम्ही असं करू शकत नसाल तर तुमच्या दुधात भेसळ आहे, तुमच्या जन्मातच भेसळ आहे असं आम्ही मानू.”