मुख्यमंत्री गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना, आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये बराचवेळ चर्चा देखील झाली. दरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील एक मोठं राजकीय विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर व मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यातील बैठक पार पडल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्वत: स्पष्ट केलं आहे की, माझा माझ्या सहकाऱ्यांवरती पूर्ण विश्वास आहे. माझे सहकारी उत्तम काम करत आहेत आणि गृहमंत्री देखील उत्तम काम करत आहेत. हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर अशा प्रकारच्या ज्या अफवा आहेत, या विरोधी पक्षाकडून पसरवल्या जात आहेत त्या निरर्थक आहेत. ”

…यांना मध्ये नाक खूपसायचं काय कारण आहे? –

तसेच, “काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांचं सरकार फार व्यवस्थित सुरू आहे. आताच मी ऐकलं की भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले ते.. यांना मध्ये नाक खूपसायचं काय कारण आहे? की राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद पाहिजे. हे तुम्ही कोण ठरवणार? आम्ही सांगतो का तुमच्याकडे कोणाला विरोधी पक्षनेते पद पाहिजे, कोणाला आणखी काय हवं आहे, नाही ना. मग याला गृहमंत्रीपद हवं आहे, त्याला ते हवंय हे सांगणं तुमचं काम नाही. हे आम्ही तिघे बसून पाहू. परंतु या फुसुकल्या सोडण्याचं काम जे भाजपाकडून सुरू आहे. त्यामुळे त्यांना वाटत असेल की तीन पक्षांमधील वातावरण कलुशीत होईल, परंतु असं काही होणार नाही. तिन्ही पक्षांचा, संपूर्ण कॅबिनेटचा एकमेकांवर विश्वास आहे. नक्कीच काही कारवाया, काही पावलं जे आहेत…मला असं वाटतय त्याकडे मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत. जे काही विषय समोर आहे. पण शेवटी हे सरकार, हे राज्य कायद्याचं आहे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

ठाकरे सरकार हे कायद्याचं राज्य चालवत आहे –

याचबरोबर, “केंद्रीय तपास यंत्रणा ज्याप्रकारे बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात घुसून राजकीय विरोधकांवरती कारवाया करत आहे. तसं महाराष्ट्र सरकार करणार नाही. यालाच कायद्याचं राज्य म्हणतात. राजकीय सूडाने किंवा बदल्याच्या भावनेनं कोणतीही कारवाई होणार नाही. यालाच कायद्याचं राज्य म्हणतात आणि ठाकरे सरकार हे कायद्याचं राज्य चालवत आहे. बेकायदेशीरपणे कोणतही कृत्य करणार नाही. ” असंही संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं.

माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास – मुख्यमंत्री

दरम्यान, गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजपा आपल्यावर महाराष्ट्रात दहशतवाद्यांप्रमाणे कारवाई करत आहे, घुसखोरी करत आहेत. त्याला आपण जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे. हे माझं मत नसून हे सगळ्यांचंच मत आहे. हे गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांचं देखील मत आहे.

मुख्यमंत्र्यांकडेच गृहखांत असावं, आतापर्यंत ती परंपरा आहे, पण…-

गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे घेतलं पाहिजे असं बोललं जात आहे. यावर संजय राऊत म्हणाले, ”जेव्हा एका पक्षाचं सरकार असतं, तेव्हा अशाप्रकारचे निर्णय होत असतात. मुख्यमंत्र्यांकडेच गृहखांत असावं, आतापर्यंत ती परंपरा आहे पण तीन पक्षाच्या सरकारमध्ये जे काही सत्तेचं वाटप होतं. त्यानुसार हे वाटप झालेलं आहे पण एकमेकांवर विश्वास असल्याने हातात हात घालून व्यस्थित काम सुरू आहे. मुख्यमंत्री सगळ्या खात्यांचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री नेतृत्व करत आहेत.”