Shivsena Shinde Ministers in Devendra Fadnavis Cabinet Sanjay Shirsat : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवलं आहे. राज्यात एकूण २८८ जागांपैकी तब्बल २३५ जागा महायुतीने जिंकल्या आहेत तर, विरोधकांच्या महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावं लागलं. महायुतीत भारतीय जनता पार्टीने १३२, शिवसेनेने (शिंदे) ५७ तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर १२ दिवसांनी राज्यात महायुतीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर १० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. आज (१५ डिसेंबर) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार झाला आणि ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता भाजपाच्या २० शिवसेनेच्या (शिंदे) १२ व राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीने विजयी आमदारांच्या संख्येनुसार मंत्रीमंडळाचा विस्तार केला आहे. आज नागपुरात शिवसेनेच्या (शिंदे) आठ आमदारांनी कॅबिट मंत्रिपदाची शपथ घेतली असून यामध्ये गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शभूराज देसाई, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर व संजय शिरसाट यांचा समावेश आहे. तर, रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल व योगेश कदम यांनी राज्यमंत्रीपदाची शपध घेतली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी १० दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

हे ही वाचा >> फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा? तिन्ही पक्षांकडून सहकार पंढरीला झुकतं माप; साताऱ्यातील चौघांना संधी

मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांमध्ये नाराजी?

शिंदेंव्यतिरिक्त शिवसेनेतील ११ आमदारांना मंत्रीपदं मिळाली आहे. त्यामुळे इतर काही इच्छुक आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उपाय देखील शोधला आहे. इच्छुक आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रत्येकी अडीच वर्षे मंत्रिपदे वाटून देण्याची योजना आखली असल्याचं सांगितलं जात होतं. यावर नवनिर्वाचित मंत्री संजय शिरसाट यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. मंत्रिपदासाठी आमदारांनी तगादा लावल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा तोडगा काढला आहे.

हे ही वाचा >> Ajit Pawar : लोकसभेतील अपयशानंतर कोणते बदल केल्यानंतर पक्षाला विधानसभेत यश मिळालं? अजित पवारांनी सांगितली चार सूत्र; म्हणाले…

अडीच वर्षे पूर्ण होण्याआधीच मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो : संजय शिरसाट

दरम्यान, नवनिर्वाचित मंत्री संजय शिरसाट यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. मंत्र्यांची निवड करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांना दिलेली सूचना शिरसाटांनी प्रसारमाध्यमांना सांगितली. शपथविधीनंतर शिरसाट म्हणाले, गेल्या ४० वर्षांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून आज मंत्रीपद मिळालं आहे. मी चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. परंतु, माझं काम आजवर मतदारसंघापुरतं मर्यादित होतं. मात्र आता संपूर्ण राज्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी मी गमावणार नाही. एकनाथ शिंदे म्हणालेत की सध्या तरी मंत्रीपदं अडीच वर्षांसाठीच आहेत. तुमची कामगिरी चांगली नसेल तर तुम्हाला अडीच वर्षे पूर्ण होण्याआधीच मंत्रीपदावरून डच्चू दिला जाऊ शकतो. जो चांगलं काम करेल तो मंत्रीपदी कायम राहील. जो चांगलं काम करणार नाही, त्याला डच्चू दिला जाऊ शकतो आणि इतरांना संधी दिली जाईल. हा एकनाथ शिंदे यांच्या चांगला फॉर्म्युला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat says bad performnance can take away ministerial post by eknath shinde asc