Manoj Jarange Patil Hunger Strike Update : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. “मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी उपोषणाला बसलो आहे. एका बाजूला राज्य सरकार आमच्याशी चर्चा करत आहे, तर दुसरीकडे गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न चालू आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. मनोज जरांगे हे जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात उपोषणाल बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज (११ जून) चौथा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत.

मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्रांसह ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. ही मागणी घेऊन त्यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले की, हे सरकार गोड बोलून माझा काटा काढू पाहतंय.

मनोज जरांगे यांच्या या आरोपांवर राज्य सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांचा काटा काढण्याचा प्रय़त्न कोणीही करत नाहीये, मुळात असं कोणी करू शकत नाही. मनोज जरांगे पाटील हे एक राज्यातील मोठं नेतृत्व म्हणून पुढे आलेलं नाव आहे. त्यांच्या रुपाने मराठा समाजाला नेतृत्व मिळालंय असं आपण म्हणू शकतो. अनेक प्रस्थापित नेतृत्वांनी यापूर्वी मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. त्या सर्वांना पर्याय म्हणून जरांगे पाटील पुढे आले आहेत. त्यामुळे इतर कोणीही त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न करत असतील. मात्र राज्य सरकाकडून त्यांचा काटा कढण्याचा प्रयत्न कधीही कोणीही केलेला नाही, तसा प्रयत्न केला जाणार नाही. याची आम्ही ग्वाही देतो.

हे ही वाचा >> लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे-भाजपाचं मनोमिलन? चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण

संजय शिरसाट म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी ज्या काही मागण्या केल्या आहेत, त्यासंदर्भात शासकीय पातळीवर सकारात्मक चर्चा चालू आहेत. त्यांच्या मागण्यांवर शासकीय पातळीवर आम्ही कायकाय करू शकतो यावर आज किंवा उद्यापर्यंत निर्णय होईल. यासंदर्भात काल एक महत्त्वाची बैठक पार पडली. अशीच एक बैठक आज किंवा उद्या होईल. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे. मराठा समाजाबाबत सकारात्मक पाऊल उचललं पाहिजे, हीच सरकारची देखील भूमिका आहे. तसेच समाजाला न्याया देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्याचा प्रत्यय तुम्हाला येत्या एक दोन दिवसांत दिसेल.