बरड-फलटण येथील आपला मुक्काम आटोपून माउलींच्या पालखीने आज सकाळी पंढरपूरच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. ‘हरिनामाचा गजर’ करत पालखी शुक्रवारी सायंकाळी सातारा जिल्ह्य़ातील सीमेवरच्या बरड (ता. फलटण) गावी विसावली.आज सकाळची आरती झाल्यावर पालखी बरडकडे मार्गस्थ झाली. सकाळी विडणी येथे चहापान झाले. तेथील नीरानदीच्या रामरामोशी पुलावर माउलींच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. ज्ञानोबांच्या पालखीसोहळ्याने नीरा नदीला प्रदक्षिणा घालत बरडकडे प्रस्थान ठेवले. पालखी दुपारी दोनच्या दरम्यान पिंपरद येथे दुपारच्या विसाव्यासाटी व न्याहरीसाठी थांबली. या वेळी चोहोबाजूंनी माउलींचा गजर सुरू होता. रात्रीच्या मुक्कामासाठी सायंकाळी उशिरा माउलीची पालखी बरड (ता. फलटण) येथे दाखल झाली. बरड येथे आज मुक्काम असून उद्या पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
हेही वाचा >>> …अन्यथा सरकारचे अवघड होईल! धाराशिवमधून जरांगे-पाटलांचा राज्य सरकारला इशारा
फलटण येथून माऊलींच्या पालखी रथ सकाळी बरडच्या दिशेला मार्गस्थ झाला. आळंदी संस्थांन कडून दिलेल्या सूचनांचे पालन प्रशासनाकडून होत नसल्याने वादावादीचे प्रसंग झाले. त्याबद्दल आळंदी संस्थान कमिटी कडून तीव्र नाराजी व्यक्त केली . तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार (आरफळकर) रस्त्यावर स्वतः गर्दीवर नियंत्रण केले.माऊलींची पालखी बरडच्या दिशेने मुक्कामासाठी जात असते. जाताना विडणी येथे पहिला विसावा असतो. यावेळी पालखीतील वाहने पुढे जाणे अपेक्षित असते. पुढे जाऊन दिंडीतील वारकऱ्यांना नाष्टा केला जातो. परंतु वाहने अडविल्यामुळे दिंडीतील वाहने अडकून पडली. त्यामुळे दिंडीतील काही चालकांनी विश्वस्तांना कल्पना दिल्यानंतर विश्वस्त स्वतः वाहन नियंत्रित नियंत्रण करू लागले. त्यावेळी वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
संत ज्ञानेश्वर माऊली सर्व समाजासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन बाहेर निघतात. यावेळी वारकऱ्यांची सेवा करणे सर्व समाजाचे आणि प्रशासनाचे कर्तव्य आहे. वारी निघण्यापूर्वी संस्थांकडून सर्व प्रशासनाला योग्य त्या सूचना केलेल्या असतात. वारीवर नियंत्रण करण्यासाठी आमची स्वतःची यंत्रणा आहे. संस्थांनचे विश्वस्त आणि कर्मचारी ते करत असतात. वारी कशी नियंत्रित करायची हे आम्हाला कोणीही सांगायची गरज नाही. पालखी सोहळ्यातील नगारा, अश्व, पालखी रथ आणि वारकरी एवढाच सोहळा असत नाही. हे प्रशासनाने लक्षात घ्यावे. यापुढे कोणतेही वादाचे प्रसंग खपवून घेतले जाणार नाहीत. वारकऱ्यांना व दिंड्यांना आणि दिंड्यांतील वाहनांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यायची आहे. बाळासाहेब पवार (आरफळकर),पालखी सोहळा व संस्थानचे विश्वस्त
© The Indian Express (P) Ltd