कराड : पुणे- बंगळुरु महामार्गाच्या सुसज्जीकरण कामात कराडच्या कोयना पुलालगत नवा पूल उभारणीच्या कामावेळी नदीपात्रातील शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीच वाहून गेल्याप्रकरणी ठपका असणाऱ्या पोटठेकेदार डी. पी. जैन कंपनीच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे जॅकवेलच्या मोटरला विद्युत पुरवठा करणारी वाहिनी तुटल्याने पुन्हा पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज बुधवारी सकाळी या ठेकेदाराच्या क्रेनवर दगडफेक करून मोडतोड केली. क्रेन जाळण्याचा प्रयत्नही झाल्याने कराडचा पाणीप्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत.

कराड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी वाहून गेल्यानंतर जुन्या जॅकवेलची दुरुस्ती करून शहराला तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, मंगळवारी रात्री डी. पी. जैन कंपनीच्या क्रेनमुळे जॅकवेलच्या मोटरला विद्युत पुरवठा करणारी वायर तुटल्याने शॉर्टसर्किट होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागल्याने अज्ञात संतप्त नागरिकांनी डी. पी. जैन कंपनीच्या क्रेनवर दगडफेक करून मोडतोड केली.

हेही वाचा – “अशोक चव्हाण आता पिंजऱ्यातील पोपट झालेत”, विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका

कराड शहरानजीक महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी कोयना नदीवर नवा पूल उभारण्यासाठी डी. पी. जैन कंपनीच्या माध्यमातून नदीपात्रात भराव टाकून पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला होता. यासाठी वापरलेले चुकीच्या कार्यपद्धतीमुळे आणि पावसाच्या पाण्यामुळे पाणीप्रवाह आणखी तीव्र होऊन शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीच वाहून गेली. आणि आठवड्याभरापासून कराडमधील लोकांचे पाण्याविना प्रचंड हाल सुरु असतानाच आता पुन्हा त्या पोटठेकेदार कंपनीने चालू पाणीपुरवठा योजनाही बंद पाडली आहे.

मंगळवारी रात्री डी. पी. जैन कंपनीची भलीमोठी क्रेन जॅकवेलच्या मोटरला विद्युत पुरवठा करणाऱ्या वायरवर उभी केल्याने शॉर्टसर्किट होऊन जॅकवेलच्या मोटरचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले. यामुळे संतप्त झालेल्या अज्ञात नागरिकांनी जॅकवेलजवळ उभ्या असलेल्या डी. पी. जैन कंपनीच्या क्रेनवर दगडफेक करून नुकसान केले. तसेच यावेळी जाळपोळ करून क्रेनचे मोठे नुकसान करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पुढील कारवाई सुरू केले आहे.

हेही वाचा – अजित पवार-गिरीश महाजन यांच्यातील खडाजंगीची चर्चा, विजय वडेट्टीवारांची खोचक टीका; म्हणाले, “उद्या एकमेकांचे…”

पालकमंत्री शंभूराज देसाई, स्थानिक आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, भाजप नेते डॉ. अतुल भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घटनास्थळी पाहणी करून उपाय योजनांचा शोध घेण्यासह टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात पुढाकार घेण्यात आला. तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेच्या पंपाची दुरुस्ती करून एकवेळचा तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र, आता वीज वाहिनी तुटून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे.