सातारा :- राज्यातील सर्व विभागांच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील ३५ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांमधून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीकरिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या कुशल नेतृत्वाखाली व योग्य मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक समीर शेख यांना अभिनंदन पत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा आंतरिक मूल्यमापन कार्यक्रम जाहीर केला आहे. या मूल्यमापन मोहिमेमध्ये ३५ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव, सहायक आयुक्त, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार होते. कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता तक्रार निवारण कार्यक्षमता, अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण सेवाविषयक बाबी, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी नावीन्यपूर्ण निकषावर आंतरिक मूल्यमापन करण्यात आले. या आंतरिक मूल्यमापनामध्ये राज्यातून सातारा पोलीस मुख्यालयाला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे.

जिल्ह्यातील सर्व मान्यवरांनी सातारा पोलिसांच्या यशाचे अभिनंदन केले आहे. अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये सातारा पोलिसांनी प्रशासकीय गुणवत्ता, संकेतस्थळे, सेवाविषयक बाबी आणि कर्मचारी प्रशिक्षण या चार मुद्द्यांवर बाजी मारली आहे. गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलीस दलाचे विशेष अभिनंदन केले आहे.

Story img Loader