सातारा: येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक, लेखक आणि नास्तिकतावादी चळवळीचे बिनीचे शिलेदार डॉ. शंतनू शरद अभ्यंकर (वय ६०) यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगा एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

डॉ. अभ्यंकर यांची सातारा जिल्ह्यातील प्रख्यात स्त्री रोगतज्ञ, वक्ता, नाटककार, सामाजिक जाणीव असलेले विज्ञानवादी कार्यकर्ता म्हणून देखील सर्वत्र ओळख होती. वाई येथील प्राज्ञ पाठ शाळा मंडळाचे ते विश्वस्त तर लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे अध्यक्ष होते.

हेही वाचा – Ajit Pawar : अजित पवार स्पष्टच बोलले, “होय गुलाबी जॅकेट आणि तो रंग निवडला कारण…”

पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयातून डॉ. अभ्यंकर यांनी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली होती. १९९७ पासून ते वाई येथील त्यांच्या वडिलोपार्जित ‘मॉडर्न क्लिनिक’ या व्यवसायातून वैद्यकीय सेवा देत होते. स्त्रीआरोग्य तज्ज्ञांच्या राष्ट्रीय काम विज्ञान समितीचे ते सचिव होते. अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी स्त्री आरोग्य विषयांवर आपले विचार मांडले.

वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाचे विश्वस्त होते. तेथील अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे ते अध्यक्ष होते. वसंत व्याख्यानमाला आणि प्रतीक थियटरचे ते माजी अध्यक्ष होते. लेखक म्हणूनही डॉ. अभ्यंकर प्रसिद्ध होते.

पाळी मिळी गुप चिळी, संभोग का सुखाचा, जादुई वास्तव्य रिचर्ड डॉकिंस, मला शास्त्रज्ञ व्हायचय, बायकात पुरुष लांबोडा, डॉक्टरांना भेटलेल्या खुमासदार माणसांबद्दल, डॉक्टर टेरेसा आणि इतर वल्ली,आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, गरोदरपणात ग्रहण का पाळू नये आदी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. अलीकडेच त्यांनी लिहिलेल्या आधुनिक वैद्यकीची शोधगाथा, शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी, डॉ क्युटरस, राधिका सांत्वनमहे या चार पुस्तकांचे प्रकाशन झाले. याशिवाय विविध वृत्तपत्रे, नियतकालिके, समाज माध्यमांवरही ते सातत्याने लेखन करत होते.

मराठी भाषेला कोणतेही ग्रहण लागणार नाही, ती सतत उंच होत राहील असे त्यांचे मत होते. मराठीतही तांत्रिक विषय मांडता येणे शक्य आहे असेही ते म्हणत. अंधश्रद्धा निर्मूलनाला क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासाची गरज आहे असे त्यांचे मत होते. शहरांबरोबरच ग्रामीण समाजजीवन, ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न याविषयी त्यांचा गाढा अभ्यास होता. ‘लोकसत्ता’मध्येही ते नियमित लिहीत असत.

हेही वाचा – Eknath Shinde : “खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा”, लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना सुनावलं

लेखकासोबतच वक्ते, कथाकार, नाटककार, अनुवादक म्हणूनही त्यांची ओळख होती. २००७ मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय शकुंतला परळकर सेवा व्रती डॉक्टर पुरस्कार, वाई वैद्यक भूषण पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आलेले आहे.

दोन वर्षांपासून डॉ. अभ्यंकर हे आजाराशी लढत होते. या अंतर्गतच पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी झाली होती. रात्री उशिरा कृष्णातरी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. अभ्यंकर यांनी मृत्यूपश्चात अवयव आणि पेशीदान केले आहे.