वाई : साताऱ्यातील सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी मागील ६१ वर्षांत पहिल्यांदाच खुले झाले आहेत. सैनिक स्कूलमध्ये ६११ विद्यार्थिनींमधून पहिल्यांदाच दहा मुली प्रवेश प्रक्रिया पार पाडून दाखल झाल्या आहेत. देशातील पहिल्या सैनिक स्कूलमध्ये महिला अधिकारी घडवण्याचे काम सुरू झाले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश झालेल्या १० मुलींशी संवाद साधला. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने २३ जून १९६१ रोजी देशातील पहिली सैनिकी शाळा साताऱ्यात सुरू झाली. या निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण दिले जाते. ६४० विद्यार्थी येथे शिकतात. पैकी १० मुलींना यावर्षी प्रथमच प्रवेश मिळाला आहे. निवासी शाळेत शिकणारी ही मुलींची पहिलीच बॅच आहे.
सैनिक स्कूलचे उपप्राचार्य िवग कमांडर बी लक्ष्मीकांत यांनी सांगितले की आत्तापर्यंत या शाळेत केवळ मुलांना प्रवेश दिला जात होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय मागील वर्षी शासनाने घेतला. त्यामुळे सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी गेल्या ६१ वर्षांत खुले झाले. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांसाठी १० मुलींना निवासी शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. यात दोन पश्चिम बंगालच्या, एक बिहारची तर उर्वरित सात विद्यार्थिनी महाराष्ट्रातील आहेत. भविष्यात मुलींच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते.
सैनिक स्कूलमधील दहा जागांसाठी ६११ विद्यार्थिनींनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यातून ही निवड झाली. या पुढील शैक्षणिक वर्षांसाठी १ हजार ४५० मुलींनी दहा जागांसाठी अर्ज केले आहेत. त्यातूनही दहा मुली सैनिक स्कूलसाठी निवडल्या जातील. १२ वीनंतर दहाच्या दहा मुली एनडीएसाठी पात्र ठरतील, यासाठी आम्हीं तयारी सुरू केली असल्याचे िवग कमांडर बी लक्ष्मीकांत यांनी सांगितले. या मुली दाखल झाल्यापासूनचे निरीक्षण सांगताना ते म्हणाले, खरंतर मुलामुलींमध्ये आम्हीं फरक करत नाही. परंतु आमच्याकडे शिकणाऱ्या काही मुलांमध्येल घराकडे जाण्याची ओढ दिसून येते. मात्र आम्हीं या मुली शाळेत दाखल झाल्यापासून पहातोय, त्या प्रचंड आत्मविश्वासानं आणि उत्साहानं इथल्या शैक्षणिक उपक्रमांत सहभागी होताना दिसत आहेत, असेही ते म्हणाले.
अंशिका शामराव ननावरे, श्रावणी दीपक वाघ, सिद्धी रोहन रावखंडे, सिद्धी संदीप गंगतिरे, याना शंकर तोटावार, पियुशा जितेंद्र चव्हाण, रिथा महेंद्र धोडी (महाराष्ट्र), अदिती संजयकुमार कश्चप (बिहार), उत्तरा जयंत भवाल, इशा कुमारी (प. बंगाल) या दहा मुलींना सैनिक स्कूलच्या निवासी शाळेत प्रथमच प्रवेश मिळाला आहे. वैभवी रोड्डे, प्राक्षा सोनार व श्रेया अगंद या कर्मचाऱ्यांच्या मुली या शाळेत शिकतात परंतु त्या अनिवासी आहेत.
परराज्यातील मुलींचा समावेश
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षांसाठी १० मुलींना निवासी शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. यात दोन पश्चिम बंगालच्या, एक बिहारची तर उर्वरित सात विद्यार्थिनी महाराष्ट्रातील आहेत. भविष्यात मुलींच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते.