लातूर – कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. शासनाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा आधार घेत चारचाकी वाहन असलेली यादी घेऊन लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या घरांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. अंगणवाडीताई घरी जाऊन याची तपासणी करत आहेत.

लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत ४ हजार ३९८ महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली. त्यात २ हजार ६७३ महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असल्याचे निदर्शनास आले आहे. महिला बालकल्याण विभागाकडे ११ हजार अर्ज तपासणीसाठी आले आहेत. दहा हजार ७९४ लाडकी बहीण योजनेतील महिलांकडे चारचाकी असल्याचे कळल्यामुळे ती यादी प्रत्यक्ष तपासणीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात आली आहे.

महिला व बालकल्याण विभागाने तालुका निहाय यादी तयार करून ती अंगणवाडी ताईकडे प्रत्यक्ष तपासणीसाठी सोपवण्यात आली आहे व अंगणवाडीताई घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत. तपासणीत चारचाकी असल्याचे निदर्शनास आल्यास ती नावे वगळण्यात येणार आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे अंगणवाडीताईंमार्फत पडताळणी करण्यात येत असताना ज्यांच्या घरी चारचाकी आहे अथवा शासकीय नोकरी लागली असेल त्यांनी स्वतःहून योजनेतून नाव वगळण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख यांनी केले आहे.

पाच एकरपेक्षा अधिक शेती लाभार्थी महिलेच्या कुटुंबाकडे असू नये ही पण अट लाडकी बहीण योजनेत आहे, त्या संबंधातही आता तपासणी केली जाणार आहे.