वाई: मराठा व ओबीसी दोन्ही समाज आपल्या मागण्यांसाठी आग्रही आहेत. कुठल्याही समाजातील नेत्यांनी, आंदोलनकर्त्यांनी बोलताना संयमाने बोलावे. त्यांच्या कृतीमुळे भावना दुखावल्या जाऊ नयेत, याची काळजी घ्यावी. कुणाच्या तरी कृतीने हे प्रश्न चिघळू नये. कोणीही कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये. कारण हे प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले असून मराठा आंदोलनाला विरोध केला म्हणून डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले. हळूहळू समाज आक्रमक होत आहे. याविषयी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारची भूमिका मांडली.

देसाई म्हणाले, मराठा समाजाच्या आंदोलनाला कोणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. मराठा समाजासह ओबीसी समाजही आपल्या मागण्यांसाठी आग्रही आहेत. कुठल्याही समाजातील नेत्यांनी, आंदोलनकर्त्यांनी, समाज बांधवांनी बोलताना संयमाने बोलावे. आपल्या कृतीमुळे कोणाच्याही भावना दुखवाल्या जाऊ नयेत याची काळजी घ्यावी. हे दोन्ही प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. हे दोन्ही प्रश्न कुणाच्या तरी कृतीने चिघळण्याचा प्रयत्न करु नये. दोन्ही समाजाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिलेली आहेत. त्यामुळे दोन्ही समाजाने संयम राखावा. अशा पद्धतीने कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सरकारने दोन्ही समाजांना जे आश्वासन दिले आहे, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : असदुद्दीन औवैसींच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसेना शिंदे गटाचा संताप, खासदारकी रद्द करण्याची मागणी

राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ आंदोलने झाली. सध्या दोन्ही समाजाने आंदोलने स्थगित केली असली तरी दोन्ही बाजूकडील नेते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. यातून मराठा आणि ओबीसी नेते टोकाची भाषा वापरत असल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. यावर शंभुराज देसाई यांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले.