शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी खातेवाटप झालं. मात्र, खातेवाटपानंतर शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुसे यांच्यासह काही मंत्री नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यावरून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केलीय. आता पत्रकारांनी विचारलं असता शिंदे गटातील मंत्री शंभुराजे देसाई यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (१६ ऑगस्ट) मुंबईत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शंभुराजे देसाई म्हणाले, “आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कुणी मिळालेल्या खात्याबाबत नाराज आहोत असं व्यक्त झालं आहे का? आमच्यापैकी कुणीही असं व्यक्त झालेलं नाही, मत प्रदर्शित केलेलं नाही. मात्र, जाणीवपूर्वक अशा वावड्या उठवल्या जात आहेत. असं का होतंय हे आम्हालाही समजत नाही. आम्ही पहिल्या टप्प्यात शपथ घेतलेले शिवसेनेचे नऊ मंत्री आहोत. या मंत्र्यांकडे कोणते विभाग द्यायचे हा पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार आहेत.”

“कुणीतरी अशा वावड्या उठवत आहे”

“आम्ही शिवसेनेचे ४० आमदार आणि ११ अपक्ष आमदार सर्वांनी पहिल्याच दिवशी आम्हाला मंत्रिमंडळात घ्यायचं का नाही, घेतल्यावर कोणतं खातं द्यायचं या सर्व बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे आमचे कुणीही मंत्री असं बोलत नाहीत. ते स्वतः बोलत नसताना कुणीतरी अशा वावड्या उठवत आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जी खाती दिलीत त्याचं काम त्यांना अभिप्रेत आहे असं करणं यावरच आमचा भर आहे. आम्ही कुणीही नाराज नाही,” असं शंभुराजे देसाई यांनी सांगितलं.

हेही वाचा : “एकनाथ शिंदे १८-१८ तास काम करतात आणि फडणवीस…”, अब्दुल सत्तार यांचं जालन्यात वक्तव्य

“आमच्यात कोणतीही नाराजी नाही”

“स्वतः खातं मिळालेले मंत्रीच त्याबाबत नाराजी व्यक्त करत नाहीत, तर केवळ चर्चा आहे आणि कुणीतरी म्हणतंय म्हणून असं बोलणं योग्य नाही. आमच्यात अशा पद्धतीची कोणतीही नाराजी नाही,” असंही देसाई यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shambhuraje desai comment on speculations of unrest in shinde group over portfolio pbs