Sharad Pawar on Manvat Murders Case: “माझ्या कारकि‍र्दीत मुंबईतील बॉम्बस्फोट, लातूरचा भूकंप अशी मोठ मोठी आव्हाने आली. पण माझी सुरुवात मानवत मर्डर प्रकरणाने झाली”, असा खुलासा शरद पवार यांनी नुकताच केला आहे. १९७२ सालीजेव्हा मानवत हत्याकांड घडले, तेव्हा शरद पवार हे नुकतेच गृह राज्यमंत्री झाले होते. त्यावेळी नेमके काय झाले? पोलीस खात्यावर कसा दबाव होता? मग रमाकांत कुलकर्णी यांच्याकडे हे प्रकरण सोपविल्यानंतर काय झाले? याची आठवण शरद पवार यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे. सोनी लिव्हवरील मानवत मर्डर्स या वेबसीरिजची टीम शरद पवारांना भेटायला गेली असताना पवारांनी त्या काळातील आठवणी उलगडल्या.

म्हणून रमाकांत कुलकर्णींकडे केस दिली

मानवत मर्डर्सच्या टीमशी गप्पा मारताना शरद पवार म्हणाले, मानवत ही माझ्या सुरुवातीच्या काळातील पहिलीच केस होती. पोलिसांना गुन्हेगार शोधण्यात यश येत नव्हते. संबंध पोलीस यंत्रणेचे खच्चीकरण झाले होते. मग मी माझ्या पद्धतीने एक उच्चस्तरीय बैठक घेतली. पोलीस दलात अतिशय प्रामाणिक, वचनबद्ध आणि सक्षम असलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे मला सुचवा. त्या दोन नावांमध्ये रमाकांत कुलकर्णी यांचे एक नाव होते. त्यांना मी बोलवून घेतले आणि सांगितले की, ही केस तुम्हाला हाताळायची आहे. विषय गंभीर आणि आव्हानात्मक आहे. तुम्ही ही केस हाताळावी, असे त्यांना सांगितल्यानंतर रमाकांत कुलकर्णी यांनी जबाबदारी घेतली.

हे ही वाचा >> Manvat Murders Review : उत्कंठावर्धक थरारनाट्य

प्रकरणाचा गुंता सोडविल्यानंतर रमाकांत कुलकर्णी यांनी केसमध्ये किती भीषण अपराध घडला होता, याची माहिती आम्हाला दिली. तपासात सातत्य आणि चिकाटी दाखविल्यामुळेच कुलकर्णींना यश आले. ते दोन ते तीन महिने मानवतमध्ये तळ ठोकून होते. याकाळात ते घरी गेले नाहीत, परतही आले नाहीत. पण शेवटी त्यांच्या तपास करण्याच्या पद्धतीमुळे गुन्हेगार सापडले.

पाहा व्हिडीओ:

काय आहे मानवत मर्डर केस?

सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात परभणीमध्ये मानवत गावात घडलेल्या हत्याकांडाने उभा देश थरारला होता. या हत्या का झाल्या? कोणी केल्या? कशा पद्धतीने घडवल्या? याचे उत्कंठावर्धक चित्रण मानवत मर्डर्स या वेबसीरीजमध्ये करण्यात आले आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी यांच्या नजरेतून ही कथा उलगडत जाते. ‘मानवत मर्डर्स’ ही आठ भागांची वेबमालिका रमाकांत कुलकर्णी यांच्या ‘फुटप्रिंट्स ऑन द सॅण्ड्स ऑफ क्राइम’ या पुस्तकावर बेतलेली आहे.

आशुतोष गोवारीकर आणि शरद पवार यांची भेट.

हे वाचा >> Manavat Murders : महाराष्ट्राला हादरवणारं मानवत हत्याकांड नेमकं होतं काय?

उत्तम पटकथा आणि या हत्याकांडाच्या मुळाशी असणारा अंधश्रद्धेतून आलेला जादूटोण्याचा भाग, प्रत्यक्षात भयंकर पद्धतीने घडलेल्या हत्या याचे अतिशय कलात्मक चित्रण दिग्दर्शक आशीष बेंडे यांनी या वेबसीरीजमध्ये केले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी या मालिकेत रमाकांत कुलकर्णी यांची भूमिका बजावली आहे. तर त्यांच्यासह सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, किशोर कदम, मयूर खांडगे, उमेश जगताप, केतन कारंडे, विठ्ठल काळे यांच्याही विशेष भूमिका आहेत.