Sharad Pawar on Gautam: Adani meeting: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाबरोबर हातमिळवणी करत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, हे सरकार अल्पावधित कोसळले. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच तो शपथविधी झाला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या युतीसाठी उद्योगपती गौतम अदाणी यांच्या घरात चर्चा झाली होती, असा दावा अजित पवार यांनी नुकताच केला. या दाव्यावर आता शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
साम वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे. २०१९ साली सत्ता स्थापन करण्यासाठी गौतम अदाणी यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, आमची चर्चा झाली असती तर आमचे सरकार आलेले तुम्हाला पाहायला मिळाले असते. पण यातली एकही गोष्ट सत्यात उतरलेली दिसली नाही. त्यामुळे अशा प्रश्नांनाही काही अर्थ नाही. ही गोष्ट खरी आहे की, निवडणुका आणि तो कालावधी सोडल्यानंतर केंद्रातले मंत्री आणि उद्योगपती भेटत नाहीत, असे मी म्हणालेलो नाही. ही गोष्टही खरी आहे की, अनेकवेळेला अजित पवार यांना घेऊन मी अदाणींची भेट घेतलेली आहे. त्यांना (अजित पवार) माहिती मिळावी हा त्यामागचा हेतू होता.
या बैठकीला अमित शाहदेखील उपस्थित होते, असाही दावा अजित पवार यांनी केला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना एकदा नाही तर तीन-तीन वेळेला मी भेटलो आहे. महाराष्ट्राच्या ऊसासंबंधी काही प्रश्न होते, त्यासंबंधी त्यांना भेटलो आहे. मी संसदेचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे त्या विषयासंदर्भात भेट घेणे आवश्यक असते. त्यामुळे यातून वेगळा अर्थ काढता कामा नये. तसेच वास्तवात असे काही घडले का? सरकार स्थापन झाले का? हे झाले नसेल तर या प्रश्नांची चर्चा करण्यात अर्थ नाही.”
एकूण पाच बैठका झाल्या
न्यूज लॉन्ड्री या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी सत्ता स्थापनेच्या वेळी झालेल्या बैठकीबाबत गौप्यस्फोट केला होता. अजित पवार म्हणाले, आमचे वरिष्ठ नेते जसं सांगतात तसं आम्ही करतो. २०१९ च्या घटनेला आता ५ वर्षे झाली. सर्वांना माहितेय कुठे मीटिंग झाली. दिल्लीत कोणत्या उद्योगपतीच्या घरात मीटिंग झाली. पण आता जे झाले ते झाले. मी पुन्हा सांगतो अमित शाह, गौतम अदाणी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार या बैठकीला होते. या बैठकीत भाजपाबरोबर जाण्यासाठी चर्चा झाली होती. सर्व ठरले होते. परंतु, त्या घटनेची जबाबदारी माझ्यावर आली.”
© IE Online Media Services (P) Ltd