शरद पवार मोठे नेते, मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय या देवेंद फडणवीसांच्या विधानानंतर राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. यावरून अनेकांनी फडणवीसांवर शेलक्या शब्दात टीकाही केली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांच्या वक्तव्यासंदर्भात दिली होती. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे. गोव्यामध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकासंदर्भात बोलताना त्यांनी एबीपी माझाला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
“गोव्यामध्ये भाजपाला प्रचंड मान्यता आहे. मनोहर पर्रिकरांची परंपरा येथे आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील चांगले काम केले आहे. तसेच मोदींबद्दल देशामध्ये असलेली सकारात्मकता या सर्व गोष्टी एकत्र केल्यानंतर गोव्यामध्ये आम्हाला विजय मिळेल असा मला विश्वास आहे. यावेळी आमची पूर्ण बहुमताची तयारी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला बहुमत मिळेल आणि त्यासाठी आम्ही गेले काही दिवस तयारी करत आहोत, “असे फडणवीस म्हणाले.
“गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने विरोधी पक्षनेता म्हणून मी महाराष्ट्र उभा आडवा सगळा पिंजून काढला आहे. करोनामध्ये जेव्हा घरातून कोणी बाहेर पडत नव्हते त्यावेळसही मी मैदानात होतो. पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळ अशावेळीही आम्ही लोकांमध्ये होतो. त्यामुळे ज्यांना सत्ता मिळवायची होती त्यांनी ती कशीही मिळवली. आता त्यावर लक्ष घालण्यापेक्षा ते ज्या प्रकारे सरकार चालवत आहेत आणि ज्याप्रकारे लोकांचा रोष आहे तो संघटित करण्याचे काम आम्ही करत आहोत,”असेही फडणवीस म्हणाले.
शरद पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले नाही याची वेदना सलत आहे असा प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी याबाबत भाष्य केले. “शरद पवार मोठे आहेत त्यामुळे मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात. आपण असेही म्हणू शकतो की, त्यांना पंतप्रधान पद मिळाले नाही त्यांची वेदना त्यांच्या मनात सलत आहे. या सगळ्या गोष्टी राजकारणात बोलाव्या लागतात. तुमच्या विरोधकांना उत्तरे द्यावी लागतात. सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे कुठल्याही पक्षाला वाटते पण आम्ही हातपाय गाळून बसलेलो नाही. विरोधी पक्षाचे उत्तम काम करत आहोत आम्हाला काही चिंता नाही,” असे फडणवीस म्हणाले.
आगामी पालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये भाजपा मित्रपक्षांना घेऊन पूर्ण ताकदीने या निवडणुकांमध्ये उतरु असे फडणवीसांनी सांगितले.
मनसेसोबत कुठलीही युती नाही
“आमचे मित्र तुम्हाला माहित आहेत. मनसेसोबत कुठलीही युती झालेली नाही. बाळा नांदगावकर युतीची बोलणी करण्यासाठी आले नव्हते. काही वैयक्तिक विषयांवर चर्चा करण्यासाठी ते आले होते,” असेही फडणवीस म्हणाले.
मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनंतर करण्यात आलेल्या मदतीच्या घोषणेवरही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले. “माझा सरकारला सवाल आहे की मागे जी मदत केली होती ती तरी पोहोचली का याचा आढावा द्यावा. मागचीही मदत पोहोचली नाही, ही मदत सुद्धा पोहोचणार नाही. आकडेवारी फेकायची याच्यापलिकडे हे सरकार काही करत नाही. राज्य सरकारने विम्याचे पैसे भरले नाहीत म्हणून शेतकऱ्यांना ते मिळाले नाहीत. कुणाला चिंता नाही. इथे सगळेच मुख्यमंत्री आहेत. आपापल्या खात्यावर सगळे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. प्रत्येक पक्षात मुख्यमंत्री आहे,” असे फडणवीस म्हणाले.
चोऱ्या माऱ्या केल्या तरी सीबीआय येऊ देणार नाही अशी यांची भूमिका
महाराष्ट्र सरकारला कमकुवत करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अनिल देशमुखांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. या सरकारने सीबीआयला अडवून ठेवले. चोऱ्या माऱ्या केल्या तरी सीबीआय येऊ देणार नाही अशी यांची भूमिका आहे. १००० कोटींच्या दलालीचे आरोप होत असतील तर केंद्र सरकारने गप्प बसायचे का? मराठवाड्यातील शेतकऱ्याला द्यायला तुमच्याकडे एक रुपया नाही आणि हजारो कोटींची दलाली सुरु आहे आणि त्यावर कारवाई करु नये असे कसे चालेल. ही नियमानुसार होणारी कारवाई आहे. याच्यामध्ये काही चेहरे उघड होत आहे म्हणून हा कांगावा करण्यात येत आहे,” असे फडणवीस म्हणाले.
किरीट सोमय्यांच्या एकाही आरोपाला उत्तर देऊ शकलेले नाहीत
“किरीट सोमय्यांच्या एकाही आरोपाला ते उत्तर देऊ शकलेले नाहीत. त्यांची विश्वसनीयता किती आहे हा आता सवाल आहे. सोमय्या रोज आरोप लावतात त्यातीस एकाही आरोपाला ते उत्तर देऊ शकले नाहीत. सोमय्या पुरावे घेऊन बोलत असतील तर त्यांना नाकारता येणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.