भाकरी फिरवावी लागते ती फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीने युवा मंथन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदल होणार हे स्पष्ट आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार यांननी बुधवारी मुंबईत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी पक्ष संघटनेत काम करणाऱ्या युवकांची वर्गवारी कशी करायची ते ठरवलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. वरच्या टप्प्यात कोणा-कोणाला आणायचे त्याचा विचार करा. महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीने निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवं नेतृत्व तयार केलं जाईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. आता विलंब करुन चालणार नाही. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, भाकरी फिरवली नाही तर ती करपते असंही वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केलं.

माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा आहे की यातून दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्याला महाराष्ट्रात तयार करायची आहे. ही फळी आपण तयार केली तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत कार्यकर्त्यांची कमतरता नाही. मुंबई ही कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलते आहे, पण इथले सामान्य कुटुंब टिकलं पाहिजे. गिरणी कामगारांची मुंबई आपण पाहिली आहे. तेव्हा कष्टकरी वर्ग हा मोठा वर्ग होता. आज तो कष्टकरी दिसत नाही. या ठिकाणी असलेल्या गिरण्या गेल्या आहेत. तिथे मोठमोठ्या इमारती झाल्या आहेत. गिरणीत काम करणारा कष्टकरी कुठे आहे ते माहित नाही असं म्हणत शरद पवार यांनी खंत व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा बदलण्यासाठी आमचा युवक पुढे येतो आहे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar hints change in ncp he said we have to give chance to youth scj