देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने व सर्व राज्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने मी आभार मानतो की त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष काढून घेतले आणि ते स्वतःकडे घेतले आहे. आणि यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगली यश मिळाले असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी श्रीगोंदे येथे बोलताना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने राज्यामध्ये जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा श्रीगोंदा येथे आल्यावर माजी आमदार राहुल जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. या यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके ,युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, विद्यार्थी संघटनेचे सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राहुल जगताप, बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, दीपक भोसले, हरिदास शिर्के, केशवराव मगर ,जिजाबापू शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा >>> Kapil Dev on farmers: कपिल देव यांचे शेतकऱ्यांना आवाहन; म्हणाले, “तुमच्या आत्महत्येमुळे आम्हाला…”

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सर्व नेते एकत्र असताना माघील लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चार खासदार राज्यात निवडून आले होते मात्र सर्वजण सोडून गेले आणि आमचे आठ खासदार निवडून आले आहे. आणि याचे श्रेय आम्ही मोदी आणि शहा यांना देतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भाजप नेते देशात व राज्यात काय तोऱ्यामध्ये वागत होते हे सर्वांनी पाहिले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या बूथ कमिट्या कोठे वाहून गेल्या हे देखील समजले नाही. याचे कारण ईडी सारख्या संस्था सांभाळणाऱ्यांना माणसे सांभाळता आले नाही. आणि शरद पवार यांनी मात्र आजपर्यंत माणसे जपली त्यामुळे हे यश मिळाले. यावेळी त्यांनी राज्यामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर कोरडे ओढले तसेच सध्या रिझर्व बँकेकडून आठ लाख कोटी रुपयांचे यापूर्वीच कर्ज घेतलेले असताना पुन्हा आणखी नवीन कर्जाची मागणी या सरकारने केली आहे याचा अर्थ आम्ही सत्तेवरून तो जाणार आहोत परंतु जाताना राज्याची वाट लावून जाणार अशी भूमिका घेतली आहे अशी टीका श्री पाटील यांनी केली.

हेही वाचा >>> Devendra Fadnavis : “सरकार सांगेल तेच अदाणींना करावं लागेल, अन्यथा…”, देवेंद्र फडणवीसांचं धारावी पुनर्विकासाबाबत मोठं वक्तव्य

यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, देशातील जनतेला भाजपने ईडी काय असते हे दाखवले. आणि या संस्थेमुळेच साहेबांचे बोट धरून राजकारणात आलेल्यांनी त्यांची बोट सोडले. आणि त्यांची अवस्था किती वाईट भाजपने केली आहे हे आता सर्व जनता पाहत आहे अशी टीका अजित पवार यांचे नाव न घेता अमोल कोल्हे यांनी केली. यावेळी बोलताना माजी आमदार राहुल जगताप पाटील म्हणाले की, कारखान्यासाठी एनसीडीसी चे कर्ज मिळत असताना देखील केवळ मी साहेबांच्या सोबत आहे म्हणून जाणीवपूर्वक डावलले गेले आहे. परंतु तुम्ही कितीही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करा, मला कितीही अडचणीत आणा तरी देखील मी श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या पाठिंब्यावर साहेबांच्या सोबत कायम राहणार आणि साहेबांची साथ कधीही सोडणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कारखान्याचे राहिलेले पैसे ५ ऑक्टोबर पर्यंत सर्व देणे देण्यात येतील असे देखील राहुल जगताप पाटील यावेळी म्हणाले.