अर्थमंत्री अजित पवारांनी नुकताच विद्यमान महायुती सरकारचा विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला. त्यात अपेक्षेप्रमाणे अनेक घोषणांचा समावेश आहे महिला, तरुण, शेतकरी आणि मागासवर्ग या मोदींनी जाहीर केलेल्या चार प्रमुख घटकांवर केंद्रीत यंदाचा अर्थसंकल्प आहे. त्यासंदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना दुसरीकडे विरोधकांकडून त्यावर निवडणूककेंद्रीत अर्थसंकल्प म्हणून टीकाही होत आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक खोचक विनंतीही केली आहे.

अर्थसंकल्पाबाबत काय म्हणाले शरद पवार?

जमेचा विचार न करता खर्चाच्या घोषणा करण्यात आल्याची टीका शरद पवारांनी अर्थसंकल्पावर केली आहे. “एखाद्या गोष्टीवर मी १०० रुपये खर्च करणार म्हटलो आणि माझ्या खिशात ७० रुपये आहेत, तर मग मी १०० रुपये खर्च कसे करणार? पहिला प्रश्न हा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे? दुसरं महसुली खर्च किती होणार आहे? आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार? याची तरतूद न करता खर्च करणार म्हटलं आणि विचारपूर्वक केलंय असं म्हटलं तरी त्याला फारसा काही अर्थ राहात नाही”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.

“लोकसभा निकालांचा धसका घेतल्यामुळेच…”

“लोकसभेत ४८ पैकी ३१ जागा आम्हाला मिळाल्या. सांगलीत विशाल पाटलांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. ४८ पैकी ३१ जागा ज्या विचाराच्या निवडून येतात, त्यातून लोकांचा कल काय आहे हे स्पष्ट होतंय. त्यातून जो धसका घेतला, त्यामुळे हा भाषेचा फुलोरा असलेला अर्थसंकल्प मांडला आहे”, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!

“मोदींची गॅरंटी काही चाललेली नाही”

दरम्यान, विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडल्याची टीका करतानाच शरद पवारांनी या निवडणुकांवरून मोदींना खोचक विनंती केली आहे. “लोकसभेचीच स्थिती विधानसभेलाही कायम राहायला काही हरकत नाही. लोक मोदींच्या कारभारावर खूश नाहीत. मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी आहे. पण ती गॅरंटी काही चाललेली दिसत नाही. प्रचाराचा पूर्ण भार हा मोदींवर होता. मोदींनी १८ सभा महाराष्ट्रात घेतल्या. त्यातल्या १४ ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे. माझी आग्रहाची विनंती आहे की विधानसभा निवडणुकीत मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात”, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली.

“लोकसभा निवडणुकीत २८८ विधानसभा मतदारसंघांत मतदान झालं. त्यातल्या १५५ ठिकाणी भाजपाचा पराभव झाला आहे. त्या ठिकाणी आमचे उमेदवार पुढे आहेत. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेनं एक इशारा दिला आहे. यात आमचं बहुमतच आहे. अशी स्थिती विधानसभेत झाली तर इथे सत्ता बदलणारच आहे. त्यासाठी अनुकूल अशी स्थिती आहे असं आमचं मत आहे”, असं गणितही शरद पवारांनी मांडलं.