Sharad Pawar Press Conference: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. यावरून उद्धव ठाकरे गट व शरद पवार गटाकडून तोंडसुख घेतलं जात असताना आता खुद्द शरद पवार यांनीच राज ठाकरेंना टोला लगावला आहे. शरद पवार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरेंबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यावर शरद पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरेंना लगावला टोला!

शरद पवारांनी यावेळी राज्यातील अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत विचारणा केली. ‘राज ठाकरेंनी मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांना सत्तेत बसवल्याशिवाय थांबणार नाही’, असं म्हटल्याचं शरद पवारांना माध्यम प्रतिनिधींनी सांगितलं. त्यावर शरद पवारांनी सूचक हास्य करत मिश्किल टिप्पणी केली.

“राज ठाकरे असं बोलत आहेत ही चांगली गोष्ट आहे. गेल्या वेळीही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती. पण दुर्दैवाने लोकांनी राज ठाकरेंसारखी भूमिका घेतली नाही. लोकांनी त्यांना एकच जागा दिली”, असं शरद पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राजू पाटील हे एकमेव उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावरून शरद पवारांनी राज ठाकरेंना चिमटा काढला आहे.

अजित पवारांना केलं लक्ष्य

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी अजित पवारांवरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार व इतर ४० आमदारांनी सत्ताधारी भाजपा व शिंदे गटासोबत युती केली होती. मात्र, त्यातील काहीजण स्वगृही परतण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. “अनेक लोकांना असं वाटतंय की एकत्रित काम करावं. आपला रस्ता चुकला. योग्य रस्त्याने जावं. योग्य रस्त्याने जाण्याची मानसिकता कुणाची असेल तर त्यांचं स्वागत आहे”, असं शरद पवार म्हणाले.

Raj Thackeray : राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा; स्वबळाचा नारा देत म्हणाले, “आपण इतक्या जागांवर…”

मात्र, अशी भूमिका सरसकट सगळ्यांच्या बाबतीत घेण्यास पक्षाची तयारी नसल्याचं शरद पवार म्हणाले. “काही लोकांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्यावर सरसकट निर्णय घेण्याची आमची मनस्थिती नाही. जे लोक विचाराने आमच्यासोबत होते, एकत्र काम करण्याची ज्यांची मानसिकता आहे त्यांना कुणाचा फारसा विरोध असण्याचं कारण नाही. पण आमच्या काही घटकांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली होती. त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यावा, यावर आमची पक्षांतर्गत चर्चा होऊन त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं त्यांनी नमूद केलं.