Sharad Pawar On Mahayuti : विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. या निकालानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आणि महायुतीला मोठं यश मिळालं. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल. सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये सरकार स्थापनेबाबत मोठ्या हालचाली सुरु आहेत. मात्र, महायुतीमधील मुख्यमंत्री कोण होईल? यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच शिवसेनेच्या (शिंदे) काही नेत्यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपाला निवडणुकीत जास्त जागा मिळाल्यामुळे संख्याबळानुसार भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असं बोललं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच अजित पवार हे देखील मुख्यमंत्रिपदाबाबत इच्छुक असल्याचं बोललं जातं. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महायुतीत कोणत्या पक्षाचा होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एक सूचक भाष्य केलं. महायुतीत संख्यबळ पाहता भाजपाच्या कुणी नादाला लागेल असं वाटत नाही, असं शरद पवार यांनी महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल? या प्रश्नावर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवरून त्यांनी एकप्रकारे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा : अजित पवारांच्या विरोधात उमेदवार दिला नसता तर काय झालं असतं? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले, “महाराष्ट्रात…”

शरद पवार काय म्हणाले?

विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमतासाठी थोड्या जागा कमी पडल्या आहेत. त्यामुळे भाजपा मित्र पक्षाला धरून ठेवतील की त्यांच्यामध्येही काही संघर्ष निर्माण होईल? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, “एकंदरीत त्यांची आकडेवारी पाहिली तर कोणी अस्वस्थ असेल किंवा कोणी नाराज होईल? याचा काही उपयोग होणार नाही. कारण भाजपाकडे एवढा मोठा नंबर (संख्याबळ) आहे.”

दरम्यान, एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की महायुतीत संख्यबळावरून मुख्यमंत्रिपद ठरवलं जाणार नाही तर आम्ही सर्वजण बसून ठरवणार आहोत. मग त्यात काही संकोच होण्याची शक्यता वाटते का? असा प्रश्न शरद पवारांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला असता शरद पवार म्हणाले, “मला वाटत नाही. कारण भारतीय जनता पक्षाकडे एवढे आमदार आहेत. त्यांच्याकडे १३० एवढा मोठा आकडा आहे. मग एवढा मोठा आकड असताना त्यांच्या (भाजपा) नादाला कोणी लागेल असं वाटतं नाही, अशी मार्मिक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेतून त्यांनी एक प्रकारे अजित पवारांनाही टोला लगावला.

मविआ आगामी महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार का?

विधानसभेत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असं शरद पवारांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “यासंदर्भात अद्याप आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. आता आमची दोन दिवसांत बैठक होणार आहे, मग ठरवू”, असं शरद पवारांनी सांगितलं.

शपथविधी सोहळ्याला जाणार का?

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होईल. सध्या महायुतीच्या नेत्यांच्या हालचाली सुरु आहेत. तसेच राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीमधील पक्षातील कोणत्या पक्षाला किती मंत्रि‍पदे मिळणार? उपमुख्यमंत्री कोण होणार? अशा अनेक प्रश्नांबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, नव्या सरकारचा शपथविधीचा सोहळा लवकरच पार पडणार असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात शरद पवार यांना नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण आलं तर जाणार का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर शरद पवार म्हणाले की, “उद्यापासून (२५ नोव्हेंबर) हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे”, असं म्हणत शरद पवारांनी थेट बोलणं टाळलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on maharashtra cm post in mahayuti devendra fadnavis eknath shinde ajit pawar politics maharashtra assembly election 2024 result gkt