Sharad Pawar Mahavikas Aghadi Face For Maharashtra Chief Minister : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती सांगितली. शरद पवार म्हणाले, एक कार्यक्रम हाती घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. आम्ही विकासाचे मुद्दे लोकांसमोर मांडणार आणि त्या बदल्यात लोकांची मतं मागणार आहोत. हे करत असताना आम्ही आमच्यासारखे विचार असणाऱ्या इतर पक्षांना, संघटनांना आमच्याबरोबर घेणार आहोत. उदाहरणार्थ कम्युनिस्ट पार्टी (दोन्ही गट) शेतकरी कामगार पक्ष आणि इतर समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ. लोकांचा पाठिंबा मिळवू. महाराष्ट्रासमोर एक प्रगतिशील पर्याय उभा करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

शरद पवार म्हणाले, “काही लोक मला विचारतात की तुमचा नेता कोण असणार? तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. आमच्या कार्यक्रमाला लोकांनी मान्यता दिली, शक्ती दिली, आम्ही निवडून आलो तर एकत्र बसून निर्णय घेऊ आणि एक सक्षम नेता राज्याला देऊ. मी तुम्हाला १९७७ सालचं उदाहरण देईन. आणीबाणीनंतर देशात निवडणुका झाल्या. जयप्रकाश नारायण यांच्या सूचनेने समविचारी पक्ष एकत्र आले आणि निवडणुकीला सामोरे गेले. लोकांनी देखील त्या पक्षांना शक्ती दिली, निवडून दिलं. निवडणूक जिंकल्यानंतर जनता पक्षाची स्थापना करण्यात आली आणि मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. आम्ही जेव्हा लोकांकडे मतं मागितली तेव्हा मोरारजी देसाई हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नव्हते. आम्ही कधीही लोकांना सांगितलं नव्हतं की अमुक नेता आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा असेल. तरीदेखील लोकांनी आम्हाला शक्ती दिली आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यांनी देश चालवला. आमचा पूर्वीचा अनुभव आहे, तीच गोष्ट आम्ही महाराष्ट्रात देखील करणार आहोत”.

हे ही वाचा >> Maharashtra Breaking News Live : “भाजपा-शिंदे गट अजित पवारांचा काटा काढणार, तो कार्यक्रम सुरू झालाय”, ठाकरे गटाचा मोठा दावा

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?

ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, आम्हाला लोकांना विश्वास द्यायचा आहे की आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय तुम्हाला देणार आहोत. विकासाचा कार्यक्रम लोकांसमोर मांडणार आहोत. निवडणुकीत आम्हाला लोकांची शक्ती मिळाल्यास मंत्रिमंडळात कोण असेल? कोणाला कुठलं खातं द्यायचं? नेता, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल ते नंतर ठरवता येईल.