पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघाचे दौरे सुरू केले आहेत. येवला, बीड, कोल्हापूरनंतर शरद पवार हे आज जळगाव दौऱ्यावर गेले. यावेळी केलेल्या भाषणातून शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. मोदी सरकारकडून केलेल्या सत्तेच्या गैरवापराबद्दल शरद पवारांनी प्रश्न उपस्थित केले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, सध्या देशात नरेंद्र मोदींचं राज्य आहे. त्यांना सत्तेत येऊन नऊ वर्षे झाली, या काळात मोदींनी काय केलं? त्यांनी फक्त इतर राजकीय पक्षांना फोडण्याचं काम केलं. त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे फोडाफोडीचं राजकारण.

हेही वाचा- “मराठा आंदोलकांवरील हल्ला फडणवीसांनीच घडवला”, माजी खासदाराचा खळबळजनक आरोप

“त्याचबरोबर लोकांनी आपल्या हातात दिलेली सत्ता लोकांसाठी वापरण्याऐवजी त्यांनी लोकांवर सीबीआय, ईडीच्या माध्यमातून खोटे खटले दाखल करण्याचं काम केलं. याचा उल्लेख अनिल देशमुखांनीही केला. काहीही संबंध नसताना आमच्या एका महत्त्वाच्या सहकाऱ्याला काही महिने तुरुंगात टाकायचं काम त्यांनी केलं. नवाब मलिकांनाही तुरुंगात टाकलं. अनेकांना तुरुंगात टाकलं. लोकांनी दिलेली सत्ता लोकांना सन्मानाने जगता येईल, यासाठी वापरण्याऐवजी भाजपाने सत्तेचा गैरवापर केला”, अशा शब्दांत शरद पवारांनी टीकास्र सोडलं.

हेही वाचा- “…तर मी राजकारण सोडेन”, अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार पुढे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान मोदी भोपाळला गेले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका-टिप्पणी केली. त्यांनी सांगितलं की, हे भ्रष्ट लोक आहे. आमच्याकडे अनेकांची माहिती आहे. माझं मोदीसाहेबांना नम्रतेनं एकच सांगणं आहे, जर कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्याविरुद्ध खटला भरा. चौकशी करा. पण तुमचे आरोप खोटे ठरले तर तुम्ही स्वत:ला काय शिक्षा देणार? हेही संपूर्ण देशाला सांगा. खोटे आरोप करणं हे देशाच्या हिताचं नाही.”

Story img Loader