Sharad Pawar Slams Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१७ जुलै) आषाढी एकादशीनिमित्त एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून सर्व वारकऱ्यांना आणि विठ्ठलभक्तांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्रात गेल्या दशकभरात जे जातीपातीचं विष पसरलंय ते समूळ नष्ट होऊ दे अशी प्रार्थना केली. जातीपातीच्या राजकारणामुळे राज्य अस्थिर झाल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची ही टिप्पणी शरद पवारांकडे रोख करणारी असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. त्यांच्या पोस्टवर तशा कमेंट्सही आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा शरद पवारांवर आरोप केला आहे की राज्यात शरद पवारांनी जातीपातीचं विष पेरायला सुरुवात केली, त्यांनीच अशा राजकारणाला सुरुवात केली. त्यामुळे राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना टोला लगावल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, यावर शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी आजच असं वक्तव्य केलेलं नाही. ते नेहमीच असं बोलत असतात. ते त्यांचं वैशिष्ट्यच आहे. ते ८-१० दिवसांनी, महिन्याने, दोन महिन्यांनी कधी जागे झाले तर असं बोलतात. साधारणत: ज्याच्यावर टिप्पणी केली की लोक दखल घेतात त्यांच्यावर राज ठाकरे बोलतात, टिप्पणी करतात.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे, “आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुरला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. ‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या… त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं.”

शरद पवार, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

“देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो. परंतु, दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो.”

हे ही वाचा >> Sharad Pawar on Ajit Pawar : ‘अजित पवारांनी विकास कामं केली तरी लोकांनी सुनेत्रा पवारांना का नाकारलं?’, शरद पवार म्हणाले, “शेवटी ती बारामती…”

“हा तोच महाराष्ट्र आहे का”, राज ठाकरेंचा प्रश्न

राज ठाकरे म्हणाले, “अगदी ७, ८ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही. म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar reply raj thackeray caste based politics in maharashtra asc