कोयता गँगची दहशत मध्यंतरीच्या काळात पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळाली होती. त्यासंदर्भातल्या बातम्याही समोर आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच कोयता गँगच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. पुण्यात बोलत असताना ते म्हणाले की विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख होती. आज काल पुण्याचं वैशिष्ट्य काय विचारलं तर लोक म्हणतात कोयता गँग. असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले शरद पवार?

“आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी पुण्यात काय केलं आहे? मी देशाच्या कामासाठी दिल्लीला जातो, पार्लमेंटचा सदस्य आहे म्हणून दिल्लीला जातो. महाराष्ट्रातली वर्तमानपत्रं मागवून घेतो, टीव्ही लावतो. तेव्हा काय बघायला मिळतं? पुण्याची चौकशी करतो तेव्हा लोक वैशिष्ट्य काय सांगतात? कोयता गँग. टेल्कोसारखा कारखाना, बजाज सारखा कारखाना, किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचं वैशिष्ट्य, विद्येचं माहेरघर हे पुण्याचं वैशिष्ट्य पण सत्ताधाऱ्यांनी ओळख काय केली आहे? तर कोयता गँग.” असं म्हणत शरद पवारांनी महायुतीवर टीका केली. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश त्यावेळी शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.

चंद्रावर जाण्याचा उद्योग पुण्यात होतो आहे

कोयता गँग आता भाषणामध्ये कोणी सांगितलं जर अलीकडच्या काळामध्ये नवी पिढी काय करतात मला माहित नाही. कसल्या तरी गोळ्या असतात ते खाल्लं की एकदम चंद्रावर जातो आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुण्याच्या भागांमध्ये व्हायला लागला आहे. आजचे राज्यकर्ते कोयता गँग असो, ड्रग्ज व्यवहार असो याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करत आहेत. यामुळे पुणे आणि पुण्याची नवी पिढी ही उध्वस्त होणार या प्रकारचे चित्र या ठिकाणी दिसते. आज हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. असंही शरद पवार म्हणाले.

सुनील टिंगरेंना म्हणाले दिवटा आमदार

शरद पवार म्हणाले, मध्यंतरी वाचलं एक आमदार अशा कामांमध्ये वेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करतो. आता मी येताना बघितलं मोठे मोठे बोर्ड होते. आमचा दमदार आमदार काय दमदार आहे? चौकशी केली की हा आमदार दमदार आहे म्हणून काय भानगड काय? नाव काय त्याचं? टिंगरे. अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकिटावर निवडून आला? त्या वेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? त्या वेळेला हा पक्ष कोणी काढला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कोणी केली? सबंध हिंदुस्थानला माहित आहे त्या पक्षाच्या वतीने तुला संधी दिली काम करावं अशी अपेक्षा केली.काही तरुण मुलं एका इम्पोर्टेड गाडीतून चालली काय आणि समोरून स्कूटर वर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उडवलं काय जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते? उद्ध्वस्त होतात आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो. याच्यासाठी मतं मागितली होती? असा सवालही शरद पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांना केला.