बारामती : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ ठिकाणी घेतलेल्या सभांपैकी आठ ते नऊ सभांमध्ये शरद पवार हा एकच विषय होता. मात्र त्यांना आता काटेवाडीचा चमत्कार कळला असेल. यापुढील निवडणुकांमध्येही पंतप्रधान मोदी यांनी माझ्याकडे लक्ष ठेवावे. कारण त्यांनी माझ्याकडे लक्ष ठेवल्यास मते विरोधात पडून आपल्याला फायदा होतो, अशी टिप्पणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर असून, त्यांनी काटेवाडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत महाशक्तीपुढे टिकाव लागणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र महाशक्तीपुढे आता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. लोकसभेला जसे काम केले, तसेच काम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत करा, असे पवार म्हणाले.