राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण अजित पवारांबरोबर शपथ घेतली होती, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. फडणवीसांच्या या विधानानंतर आज शरद पवारांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट हटली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनता आलं, अशा आशयाचं विधान शरद पवारांनी केलं.

शरद पवारांच्या या विधानानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांची भीती वाटत होती. फडणवीसांनी २०१४-१९ या काळात ज्यापद्धतीने काम केलं आहे, अशा स्थितीत फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील १५ वर्षे सत्तेत येता येणार नाही, अशी भीती शरद पवारांना वाटत होती, असं विधान बावनकुळेंनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची माती…”, १४ वर्षे तुरुंगात राहण्याची तयारी असल्याचं म्हणत नवनीत राणांचा हल्लाबोल!

शरद पवारांच्या विधानाबाबत विचारलं असता बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांनी मान्य केलं की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री न होऊ देण्यासाठी त्यांनी सारं षडयंत्र रचलं होतं. माझं व्यक्तिगत मत आहे की, फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होऊ नये, म्हणून त्यांनी साऱ्या युक्त्या केल्या. खरं तर, शरद पवारांना भीती वाटत होती की, देवेंद्र फडणवीसांनी ज्यापद्धतीने २०१४ ते २०१९ काम केलं. त्यानंतर राज्याने आम्हाला बहुमत दिलं. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर पुढील १५ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत येण्याची कुठलीच संधी राहणार नाही.”

हेही वाचा- “महाराष्ट्रात काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव येतं…”, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांची मिश्कील टिप्पणी!

बावनकुळे पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत जेवढे षडयंत्र झाले आहेत. जेवढे राजकीय पक्ष तोडले गेले, हे पक्ष कुणी तोडले? आम्ही तर बहुमताने निवडून आलो. आमची युती तोडण्याचं कामही शरद पवारांनी केलं. त्यांच्या पार्टीला कधी १०० च्या वर जागा जिंकता आल्या नाहीत. त्यांची पार्टी नेहमची ७५ च्या खाली राहिली. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी त्यांनी नेहमीच पक्षांची तोडफोड केली. शिवसेनेला आज त्यांनी उद्धवस्त करून टाकलं आहे.”