मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ५० रेडे पुन्हा एकदा गुवाहाटीला चालले आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. या टीकेला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांमुळेच ५० आमदार फुटले असा आरोप पाटलांनी पुन्हा केला आहे.
“संजय राऊत महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही, असं वक्तव्य करतात. त्यांच्याकडे शिंदे गटावर बोलण्यासारखं आता काहीही उरलं नाहीये, त्यामुळे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही, अशी विधानं करतात. ५० लोक सोडून जाण्याला खऱ्या अर्थाने संजय राऊतच कारणीभूत आहेत. ही लोक परत आली असती, पण संजय राऊतांसारख्या निष्ठूर माणसामुळे एकही माणूस जोडू शकला नाही. अशी लोक काहीही बोलतात. बोलण्याची काहीतरी पद्धत असते” अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- मुंबईत ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमने-सामने; विकासकामाच्या श्रेयवादावरून जोरदार घोषणाबाजी
पाटील पुढे म्हणाले, “५० लोक एका तत्त्वामुळे सोडून गेले आहेत. आताही दररोज एक-एक माणूस ठाकरे गटाला सोडून जातोय, ते सोडून का जात आहेत, हे राऊतांनी आधी तपासून बघावं. संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यामुळे ते काय बोलतील? कोणाला काय म्हणतील? हे सांगता येत नाही. त्यांच्याबाबत बोलणं हे विनाकारण वेळ वाया घालवण्यासारखं आहे. तो माणूस कालपर्यंत तुरुंगात होता, तो गुन्हेगार माणूस आहे” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.