Uday Samant on Eknath Shinde: दावोस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) हजेरी लावण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे पोहोचले आहेत. उदय सामंत दावोसला गेल्यानंतर इथे राज्यात वेगळीच राजकीय वावटळ उठली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यांनी उदय सामंत यांच्याकडे इशारा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच शिवसेनेत ‘उदय’ होणार होता, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले. वडेट्टीवार यांनीही अशाच प्रकारचे विधान केल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला. यावर आता स्वतः उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदय सामंत यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. “मी आताच झुरीच विमानतळावर उतरलो आहे. उतरल्यानंतर महाराष्ट्रात माझ्याबद्दल झालेली वक्तव्ये कळली. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेले विधान ऐकले. त्यांचे विधान राजकीय बालिशपणा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला, त्यात मी सामील होतो. त्यामुळेच मला दोनदा राज्याचे उद्योग मंत्रीपद मिळाले. याची मला पूर्ण जाणीव आहे. मला राजकीय जीवनात घडविण्यासाठी शिंदे यांनी केलेले प्रयत्न मी कधीही विसरू शकत नाही.”

भाजपामध्ये येण्यासाठी वडेट्टीवारांनी घेतली फडणवीसांची भेट

उदय सामंत पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे कुणीही आमच्यात वाद निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार काहीतरी बोलले, असे मला कळले. त्यांनाही सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे, मी आणि तुम्हीही सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाला आहात. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातून आलेली दोन लोक एकत्र असतील तर त्यांना वेगळे करण्याचे षडयंत्र तुम्ही करू नका. कारण तुम्हीदेखील भाजपामध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना कितीवेळा भेटलात, याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. मी राजकीय मूल्य पाळतो, त्यामुळे मी वैयक्तिक टीका करणे टाळतो. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संपविण्यासाठी असे फालतू षडयंत्र कुणी करू नये, ही माझी सूचना आहे.”

संजय राऊत नेमके काय म्हणाले?

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांना दावोसला नेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्याबरोबर २० आमदार आहेत. सरकार स्थापन करत असताना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच हा ‘उदय’ होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader uday samant give clarification on sanjay raut and vijay wadettiwar claims kvg