शिवसेनेत पडलेल्या फुटीला आणि राज्यातील महायुतीच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुती सरकारच्या दोन वर्षांच्या काळातील कामासंदर्भात भाष्य केलं आहे. ‘विचार..विकास..आणि विश्वास… राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली’, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाष्य करत ‘आज जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होत आहे’, असा खोचक टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“आज जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होत आहे. निर्लज्जपणे आज खोके दिवस साजरा केला जातोय. जे घाबरट आहेत, डरपोक आहेत. ते पक्ष चोरतात. वडील चोरतात. स्वत:च्या बॅनरवर दुसऱ्यांचे वडील यांना लागतात. हे अशी लोक आहेत”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

हेही वाचा : “येत्या काळात बरेच धमाके होणार, अनेकजण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

मुख्यमंत्री शिंदेंची पोस्ट काय?

“विचार, विकास आणि विश्वास! राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली. या दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे भक्कम पाठबळ लाभले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली. राज्यातील जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली”, असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.

मुख्यमंत्री शिंदे पुढं म्हणाले, “राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारामुळेच घडू शकले. हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.