आगामी विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्याच्या कामांवरून आणि रस्त्यांवरील खड्यांवरून महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच नोव्हेंबरनंतर आमचं सरकार सत्तेत येणार असून खोके सरकारची सगळी कंत्राटं आम्ही रद्द करणार आहोत. तसेच मुंबईची लूट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला दिला.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार येणार आहे. आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेतील सर्व कामांची चौकशी करणार आहोत. त्यामध्ये मागचे महापालिका आयुक्त असतील किंवा कोणतेही अधिकारी असतील. तसेच महायुती सरकारमधील कोणताही मंत्री असेल. त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. एका बाजुला मुंबईची लूट सुरु आहे, तर दुसऱ्या बाजुला महाराष्ट्राची लूट सुरु आहे”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

हेही वाचा : Anil Deshmukh on Eknath Shinde: “एकनाथ शिंदेंआधी पहिला प्रयोग माझ्यावर झाला”, अनिल देशमुखांचा मोठा दावा; म्हणाले, “तो यशस्वी झाला असता तर…”

“मध्यतरी आणखी एक विषय आला होता. तो विषय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा होता. आम्ही एका फोटोवर आक्षेप घेतला होता. त्यामध्ये कंत्राटदार कुठेही दिसत नव्हते. पण पोलीस रस्त्यावरील खड्डे भरत होते, म्हणजे कंत्राटदारांची मज्जा सुरु आहे. मुंबई- गोवा महामार्ग असेल किंवा मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल. हे तीनही महामार्ग केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येतात. मग एवढा महाराष्ट्र द्वेश कशासाठी? मी नितीन गडकरी यांना विनंती करणार आहे की तुम्ही एकदा गाडीने या तीन महामार्गाने प्रवास करा. किती खड्डे या रस्त्यांवर पडलेले आहेत हे पाहायला मिळतील. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एकही चांगला रस्ता बनवलेला नाही”, असा आरोप यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका

“गेल्या १० वर्ष एमएसआरडीसीचं खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. समृद्धी महामार्गावरी खड्डे पडले आहेत. अपघाताच्या घटना वाढत चालल्या आहेत. मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सी लिंकच काम महापालिकेनं हातात घेतलं तेव्हा वरचा भाग हा एमएसआरडीसीच्या खात्याकडे गेला. आता २०१७ ते आजपर्यत किती वर्ष झाले. किती खर्च झाला कितीवेळा त्यासाठी कंत्राट देण्यात आलं. आता असं झालं आहे की केंद्र सरकारच्या बजेटमध्ये ना आवडता महाराष्ट्र असं होतं. तसं लाडका कंत्राटदार ही योजना गेली दोन वर्ष महाराष्ट्रात सुरु आहे. महाराष्ट्राची लूट सुरु आहे. पण मी तुम्हाला शब्द देतो आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर हे सर्व भ्रष्ट कंत्राटदार, अधिकारी किंवा कोणी मंत्री असतील त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.