शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून, याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील शहरात असणार आहेत. आदित्य ठाकरे कात्रज चौकात सभा घेणार असून यानिमित्ताने बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे केवळ एक साधे आमदार असून, आपण त्यापेक्षा जास्त महत्व देत नाही असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. तानाजी सावंत यांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. कोल्हापुरात जनता दरबार पार पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले –

आदित्य ठाकरे पुण्यात कात्रज चौकात जिथे सभा घेणार असून तिथपासून काहीच अंतरावर तानाजी सावंत यांचं कार्यालय आहे. दुसरीकडे पुण्यात आज एकनाथ शिंदें यांचेही कार्यक्रम आहेत. याच पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांना आदित्य ठाकरे शक्तीप्रदर्शन करत आहेत का? असं विचारण्यात आलं. त्यावर एकेरी उल्लेख करत ते म्हणाले. “आदित्य ठाकरे कोण आहेत? तो फक्त एक साधा आमदार आहे. यापेक्षा जास्त महत्त्व मी त्याला देत नाही”. आदित्य ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन कसलं, त्यांचा तर शक्तीपात झाला आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

“गेले एक महिना या गद्दारांचं…”, कार्यालयातून फोटो काढणाऱ्या बंडखोरांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर –

तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे कोण आहेत? असं विधान केल्याचं सांगितलं असता ते म्हणाले “त्यांना असाच विचार करत राहू दे, भ्रमात राहू दे, आम्ही लक्षही देत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला, ठाकरे कुटुंबाला एकटं पाडण्याचा कट ४० आमदार करत होते. त्यांचे प्रयत्न सुरु असून लोकांचं प्रेम पाहता ते आम्हाला एकटं पडू देणार नाहीत याची खात्री आहे”. लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकजण आम्ही उद्धव ठाकरेंसोबत उभे असून गद्दारी आवडलेली नाही असं सांगत आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Maharashtra News Live : पुढचा एक महिना ही सर्कस सुरु राहणार – आदित्य ठाकरे, सर्व घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…

एकनाथ शिंदेदेखील आज पुण्यात आहेत असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले “पुढचा एक महिना ही सर्कस सुरु राहणार आहे. हा काही राजकीय दौरा नाही. लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे”.

कार्यालयातून फोटो काढणाऱ्या बंडखोरांना प्रत्युत्तर

“आता यांचा खरा चेहरा समोर येत आहे. गेले एक महिना या गद्दारांचं उद्धव ठाकरेंविषयी आमच्या मनात आदर आहे, आदित्य ठाकरेंविषयी प्रेम आहे, आदित्य मुलासारखा आहे असं नाट्य सुरू होतं. आता त्यांच्या मनातील खरे विचार लोकांसमोर येत आहेत. त्यांना कारवाई टाळायची होती म्हणून ते स्वतःला शिवसैनिक म्हणत होते. आता तुम्ही त्यांचे खरे चेहरे बघत आहात.”

“बंडखोरांनी गद्दारी केली आहे आणि गद्दार हा गद्दारच असतो. तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. सध्या कोणताही राजकीय पक्ष आनंदी नाही. गद्दारीचा हा पॅटर्न इतर राज्यात जायला लागला तर देशात अस्थिरता निर्माण होईल. हे ४० आमदार व १२ खासदारांना जनतेसमोर जावंच लागणार आहे. जनता त्यांच्याबाबत काय निकाल द्यायचा ते ठरवेल,” असंही आदित्य ठाकरेंनी नमूद केलं.

“३३ दिवस ओलांडूनही या बेकायदेशीर सरकारला तिसरा माणूस सापडलेला नाही. दोन लोकांचं जम्बो कॅबिनेट आहे. त्यातही खरा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न लोकांना पडलेलाच आहे,” असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena aditya thackeray on eknath shidne camp tanaji sawant pune rally sgy