वेदांत कंपनीचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. वेदांतचा हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार, हे जवळपास निश्चित झालं असताना हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, असं हे सरकार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांतचा संबंधित प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी आम्ही मागील अनेक दिवसांपासून चाचपणी करत होतो. अनेक बैठका घेत होतो. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार हे जवळपास ९५ टक्के निश्चित झालं होतं. स्वाक्षरी झाल्यानंतर १०० टक्के प्रकल्प महाराष्ट्रात आला असता. संबंधित कंपनीने पुण्याजवळील तळेगाव येथे प्रकल्प उभारण्यासाठी जागा निश्चित केली होती. सर्वकाही सकारात्मक घडत असताना, एवढा मोठा प्रकल्प गुजरातला कसा काय गेला? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

हेही वाचा- पोलीस ठाण्यात गोळीबार केला का? त्या रात्री काय घडलं? सदा सरवणकरांनी सांगितला घटनाक्रम, म्हणाले…

आदित्य ठाकरेंनी पुढे सांगितलं की, सुभाष देसाई आणि मी वेदांत कंपनीसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पाडल्या. २१ जानेवारी २०२२ रोजी आमची वेदांत आणि फॉक्सकॉनच्या उद्योगाबाबत चर्चा झाली. त्यानंतर जागा निश्चितीसाठी मराठवाडा, विदर्भ आणि पुणे विभागात अनेक ठिकाणी पाहणी करण्यात आली. शेवटी पुण्याजवळील तळेगाव येथील जागा निश्चित केली. हा उद्योग गुजरातमध्ये जाण्याबाबत किंवा कुठेही इतरत्र जाण्याबाबत दु:ख नाही. पण ही कंपनी महाराष्ट्रात येणार हे ९५ टक्के ठरलं असताना, शेवटच्या क्षणी ही गुंतवणूक दुसरीकडे का गेली? हा प्रश्न आहे.

हेही वाचा- १ लाख ५४ हजार कोटींचा ‘मविआ’ने आणलेला ‘तो’ प्रकल्प गुजरातला गेला; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

“महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग पावणे दोन लाख कोटींचा आहे. या उद्योगासोबत १०७ इतर छोटे-मोठे उद्योग उभे राहणार होते. याच्या माध्यमातून ७० हजार ते १ लाख रोजगार निर्माण होणार होते. सध्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. हे वातावरण महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगलं नाही. आगामी काळात क्युबिक, एअर बस किमान हे प्रकल्प तरी महाराष्ट्रात यावेत, अशी आमची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वेळीही मुंबईतील अनेक उद्योग अहमदाबादला गेले. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके, असं हे सरकार आहे. ‘बाजीगर’ चित्रपटात एक डायलॉग आहे, ‘हार के जीतने वाले को बाजीकर कहते है’, पण या गुंतवणुकीच्या बाबतीत, जीत के हारनेवाले को खोके सरकार कहते है, असं लागू होतं” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader aditya thackeray on vedanta foxcon project went to gujrat eknath shinde rmm
Show comments