शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतून बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. बंडखोर आमदारांना ताकद दिली ही माझी चूक आहे. राजकारणात जन्म दिलेल्या आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे. विश्वासघातक्यांना माझ्याबद्दल काय वाटतं याबद्दल मला चिंता नाही. महाराष्ट्राच्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो, हे भाग्य माझं भाग्य आहे, असं उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले आहे.

बंडखोर आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो न वापरता सभा घेऊन दाखवावी, असं आव्हानदेखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यानंतर आता शिवसेनेचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे. बंडखोर आमदारांनी शिवसेना खरंच वाचवायची असेल, तर त्यांनी आजही मातोश्रीवर परत जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधावा, असं त्यांनी म्हटलं आहे. ते टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

हेही वाचा- धनुष्यबाणाच्या संघर्षादरम्यान शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचं मोठं विधान, म्हणाले, “निवडणूक आयोग…”

“बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत” या दीपक केसरकर यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता बडगुजर म्हणाले, “यात दीपक केसरकर यांचा कुठे संबंध आला? त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कधी ऐकले? केसरकर २०१४ साली शिवसेनेत आले. नारायण राणेच्या धाकाने इकडे आलेला हा माणूस आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन २०१२ साली झालं आणि केसरकर २०१४ साली शिवसेनेत आले. त्यामुळे आता ते जे काही पोपटपंची करत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरून हा माणूस मला लबाड वाटतो. तो ज्या पद्धतीने बोलतो, त्याची नजर सांगते की हा भामटा माणूस आहे” अशी टीका सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.

Story img Loader