सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा सहावा दिवस आहे. जरांगे-पाटलांनी अन्नपाण्याच्या त्याग केला आहे. त्यामुळे जरांगे-पाटलांची प्रकृती खालावली आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.
“जरांगे-पाटलांचा बळी घेण्याचं कट-कारस्थान राज्यकर्त्यांच्या मनात आहे का? मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीनं लोकसभेचं अधिवेशन बोलवावं,” अशी मागणी विनायक राऊतांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
विनायक राऊत म्हणाले, “मिंधे सरकार कपटी वृत्तीचं आहे. सरकार जरांगे-पाटलांच्या जीवाशी खेळतंय. सरकारबरोबर चर्चेस तयार असल्याचं जरांगे-पाटलांनी सांगितलं. पण, सरकारच्या दलालांनी जरांगे-पाटलांची दखल घेतली नाही.”
हेही वाचा : अजित पवार गटातील आमदाराच्या घरावर दगडफेक, वाहनं जाळली; सुप्रिया सुळे फडणवीसांवर संतप्त होत म्हणाल्या…
“रविवारी एका दिवसांत चार मराठा तरूणांनी आत्महत्या केल्या आहेत. जरांगे-पाटलांचा बळी घेण्याचं कट-कारस्थान राज्यकर्त्यांच्या मनात आहे का? अशी शंका निर्माण झाली आहे. जरांगे-पाटलांच्या पाठिशी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि आम्ही उभे आहोत. पंतप्रधान मोदींनी लोकसभेचं तातडीचं विशेष अधिवेशन बोलवावं. मराठा आणि धनगर आरक्षणाचं बिल मंजूर करून घ्यावे,” अशी मागणी विनायक राऊतांनी केली.
“सरकारला बळी घ्यायचा, तर घेऊद्या”
अंतरवाली सराटी येथे मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमले आहेत. आंदोलकांनी जरांगे-पाटलांना पाणी पिण्याचं आवाहन केलं. त्यावर “पाणी पिले तर आरक्षण कसं भेटणार? सरकारला एखादा बळी घ्यायचा, तर घेऊ द्या,” असं जरांगे-पाटलांनी सांगितलं.