नवाब मलिक अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसल्यानंतर ते अजित पवार गटात आल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक तुमच्यासह कसे? असा आरोप महायुतीवर होऊ लागला. या सगळ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत. सत्तेपेक्षा देश मोठा आहे त्यामुळे त्यांना महायुतीत घेऊ नका असं म्हटलं आहे. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होते आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही व्हिडीओ पोस्ट करत तेव्हा कुठे गेला होता तुमचा विवेकवाद असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“नवाब मलिक अजित पवार गटासह येण्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र अजित पवार यांना लिहिलं आहे. ज्यामध्ये नवाब मलिकांवर देशद्रोहाचे आरोप असल्याने त्यांना बरोबर घेऊ नये असं म्हटलं आहे. हा सगळाच गंमतीदार भाग आहे. गुरुवारी दिवसभरातल्या घडामोडी पाहिल्या तर देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल झाल्यानंतर पत्र लिहिण्याची उपरती झाली आहे. पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेपेक्षा देश मोठा असंही म्हटलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांना साधा प्रश्न आहे की सत्ते पेक्षा देश मोठा असं आपल्याला वाटत असेल तर मग आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपाने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठे गेला होता? देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक विचारायचं आहे ते म्हणजे आपण ज्या अजित पवारांना पत्र लिहिलं आहे त्याच अजित पवारांवर सन्मानीय नरेंद्र मोदींनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. इतका गंभीर आरोप झाल्यानंतर ४८ तासांच्या आत त्यांना (अजित पवार) सत्तेत सामावून घेणं हे तुमच्या नैतिकतेत बसलं का? त्यावेळी सत्तेपेक्षा देश मोठा हे तत्त्वज्ञान तुम्हाला का सुचलं नाही? अजित पवारांना सत्तेत सामावून घेणं चुकीचं आहे हे सांगणारं पत्र आपण भाजपाच्या कोणत्या नेत्याला लिहाल? ” हे प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.

नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर आणि..

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्यावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने डिवचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून मलिकांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, असे सांगितले. त्यामुळे अजित पवार यांची कोंडी झाली असून महायुतीमध्ये सारे आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवाब मलिक यांच्यावर काय आरोप?

दाऊद इब्राहिमच्या बहिणीची मदत घेऊन जमीन बळकविल्याप्रकरणी ‘ईडी’ने मलिक यांना अटक केली होती. भाजपने मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले आहेत. अजित पवार महायुतीत येताच काही दिवसांनी मलिक यांना जामीन मिळाला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, गुरूवारी मलिक हे विधान भवनात दाखल होताच अजित पवार गटाच्या कार्यालयात गेले. तेव्हाच ते अजितदादांबरोबर असल्याचे स्पष्ट झाले. सभागृहातही ते सत्ताधारी बाकांवर बसले.

नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याच्या कृतीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांना डिवचले. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, की आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत. देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रीपदावरून का काढले नाही, याचे उत्तर आधी द्या मग आम्हाला प्रश्न विचारा. त्याच वेळी त्यांनी अजित पवार यांना पत्रही पाठवले व मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट केले. हे पत्र लगोलग प्रसार माध्यमांकडे पाठविण्यात आल्याने पवार गटातून नाराजी प्रकट झाली. फडणवीस अजितदादांना हे खासगीत सांगू शकले असते. पत्र माध्यमांकडे पाठविण्याची आवश्यकता नव्हती, असा सूर पवार गटातून उमटला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena ubt leader sushma andhare asks this questions to devendra fadnavis over letter on nawab malik scj