Sanjay Raut : महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस असेपर्यंत राज्यातील मराठी माणसाला सुख आणि शांती मिळणार नाही असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वेशांतराचा मुद्दा उपस्थित केला होता. तसंच आजही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले संजय राऊत?

“महाराष्ट्रात नाटक, संगीत, चित्रपट, राजकारण याला खूप मोठी परंपरा आहे. मराठी माणसं नाटकांवर आणि रंगभूमीवर प्रेमही करतात. त्याचप्रमाणे आपले जे नवे विष्णुदास आहेत बारामतीचे विष्णुदास यासाठी म्हणायचं की विष्णुचे तेरावे अवतार दिल्लीत आहेत त्यामुळे विष्णुदास त्यांची नाट्यकला समोर आली आहे. अभिनय, कला, दिग्दर्शन, नेपथ्य हे पण बाहेर येईल. असा टोला संजय राऊत यांनी अजित पवारांना लगावला. तसंच एकनाथ शिंदे मौलवीचा वेश धारण करुन दिल्लीत गेले होते, आधी अहमद पटेलांना भेटायला गेले. त्यानंतर अमित शाह यांना भेटले. असं त्यांचेच लोक सांगत आहेत.” असं संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले

हे पण वाचा- Uddhav Thackeray : “देवेंद्र फडणवीस वेशांतर करुन अमित शाह यांना भेटत असतील तर त्यांनी..”, उद्धव ठाकरेंची मागणी

Sanjay Raut पुढे म्हणाले, “छगन भुजबळ बेळगावात सीमा प्रश्नाचा लढा दिला त्यासाठी वेशांतर केलं होतं. ते वेशांतर लोकांना आवडलं होतं. त्यांनी लाठ्या-काठ्या खाल्ल्या होत्या. अशा प्रकारे राष्ट्रासाठी भूमिका वठवल्या आहेत. मात्र या ज्या भूमिका समोर येत आहेत त्या काही बऱ्या नाहीत. हरुन अल रशिदची पोरं आहेत ही सगळी. तो वेशांतरं करुन फिरायचा. मी जी मागणी केली आहे की राष्ट्रीय सुरक्षा कशी धोक्यात आहे? याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवलं आहे त्यावर काय कारवाई होणार? हा माझा सवाल आहे” असं संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

केंद्राची साथ असल्याशिवाय वेशांतरं कशी चालतात?

महाराष्ट्रात नाटकाला, रंगभूमीला खूप मोठी परंपरा आहे. एकांकिका, संगीत नाटक, भारुड हे सगळं महाराष्ट्राला आवडणारं आहे. मात्र हा जो प्रकार सध्या सुरु आहे तो महाराष्ट्रासाठी घातक आहे. तुम्ही खोटी नावं, वेशांतरं करुन, खोटी ओळखपत्रं तयार करुन मुंबई आणि दिल्ली विमानतळांवरुन प्रवास करता. अमित शाह यांच्या हाती या विमानतळांची सुरक्षा आहे. याचा अर्थ अमित शाह यांनी CRPF ला कळवलं आहे की यांना सोडा. यापूर्वी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, दाऊद, छोटा शकील यांना सोडलं आहे का? याचाही अभ्यास करावा लागेल. सीआरएफच्या कमांडरला केंद्रीय गृहखात्याच्या सूचना असल्याशिवाय वेशांतर करुन कुणी जाऊच शकत नाही. आम्हालाही अडवलं जातं, मंत्र्यांना अडवलं जातं. मग हे मुल्ला-मौलवीचे वेश धारण करुन दिल्लीला कसे गेले? सुरक्षा व्यवस्थेतून त्यांना बाहेर पडता यावं म्हणून दिल्लीहून सूचना असायलाच हव्यात असा आरोपही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केलं.

सुनील तटकरे हे फिरत्या रंगमंचाप्रमाणे आहेत

सुनील तटकरे हे फिरत्या रंगमंचाप्रमाणे आहेत. अजित पवारांना अडचणीत आणण्याचं काम या फिरत्या रंगमंचाने केलं आहे. काही गोष्टी गोपनीय असतात, चोरांनी चोरासारखं वागलं पाहिजे. ज्याने गु्न्हा केला आहे तो तोंड लपवून फिरतो. जे गद्दार आणि बेईमान आहेत त्यांनी स्वाभिमानाचा आव आणू नये. असाही टोला संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी लगावला.

जोपर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत…

महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत राज्यातील मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सुखात शांततेत नांदवायचा असेल तर आम्हाला सत्तांतर घडवावं लागेल आणि जो कचरा आहे त्यांच्यावर खटले दाखल करावे लागतील. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच मातोश्रीवर जे मराठा आंदोलक आले होते त्यात भाजपाचे पदाधिकारी होते असं विचारलं असता या प्रकारच्या राजकारणाला फडणवीस टच म्हणतात असा टोलाही संजय राऊत यांनी ( Sanjay Raut ) लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena ubt mp sanjay raut slams devendra fadnavis and said this thing about him scj