सांगली : मिरज विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे पक्षाचा हक्क असून तो जर दबावाने डावलून मित्र पक्षांनी जागा घेतली तर ‘सांगली पॅटर्न’ वापरला जाईल, असा इशारा जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी शनिवारी दिला. मिरजेत शिवसेना ताकदीने लढेल आणि जिंकेलही असा विश्वास खा. संजय राऊत यांना भेटून दिला असल्याचेही विभुते यांनी सांगितले.

शनिवारी सकाळी विभुते यांच्यासह संघटक बजरंग पाटील, उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर, तालुका प्रमुख संजय काटे, इच्छुक असलेले तानाजी सातपुते, सिध्दार्थ जाधव आदींनी मुंबईत खा. राऊत यांची भेट घेऊन महाविकास आघाडीमध्ये खानापूर, सांगली व मिरज मतदारसंघासाठी आग्रह धरण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना: डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार? अदिती तटकरे म्हणाल्या…

मिरज मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असून युतीमध्ये तो भाजपसाठी सोडण्यात आला होता. मात्र, आता आम्ही लढण्यास समर्थ आहोत. काँग्रेसकडून आयात उमेदवार पुढे करून उमेदवारीवर हक्क सांगण्यात येत असेल तर शिवसैनिक तो कदापि मान्य करणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीतून शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांनी लढत दिली. मात्र, स्थानिक पातळीवर भाजप नको म्हणून खा. विशाल पाटील यांना मतदान झाले.

हेही वाचा : “…तर अमित शाह महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करतील”, संजय राऊतांचा गंभीर आरोप!

आता विधानसभेसाठी मिरजेची जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळाली पाहिजे. ती जर महाविकास आघाडीतील घटक पक्षाला देण्यात आली तर शिवसेना कदापि मान्य करणार नाही. सांगली लोकसभा निवडणुकीवेळी ज्या पध्दतीने काँग्रेसने आघाडीत असूनही बंडखोरीला साथ दिली, त्याच पध्दतीने सांगली पॅटर्न वापरून आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही विभुते यांनी दिला.