Uddhav Thackeray Mulakhat Part-2: मुंबईचा घात होऊ शकतो, हे त्यांचं जुन स्वप्न आहे. दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे असा विचित्र प्रकार आहे असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी युती झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या विधानाचीही आठवण करुन दिली. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Uddhav Thackeray Interview: “शरद पवारांची तशी ओळखच…”, उद्धव ठाकरेंनी सांगितलं विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाण्याचं कारण

मुंबईचा घात करण्याची योजना दिसत आहे का? तसंच मुंबईवर शिवसेनेचा जो पगडा आहे तो मिटवण्याचा प्रयत्न होत आहे का? असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले “त्यांना तो ठसा पुसायचा आहे. घात नक्कीच होऊ शकतो आणि हे त्यांचं जुनं स्वप्न आहे. जसा रावणाचा जीव बेंबीत, तसा या राज्यकर्त्यांचा जीव मुंबईत आहे. दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे असा विचित्र प्रकार आहे”.

“महाराष्ट्रात आणि मुंबईतही जागा देणार नसाल तर युतीला अर्थ काय?”

“युती झाली तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी तुम्ही देश सांभाळा, मी महाराष्ट्र सांभाळतो म्हटलं होतं. पण तुम्ही देशात तर पसरु देत नाही. दिल्लीत लाल किल्ल्यावर जाऊन भाषण करण्याची आपली इच्छा नाही. पण निदान महाराष्ट्रात आणि मुंबईतही जागा देणार नसाल तर युतीला अर्थ काय?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

“पर्यावरणाचा घात होईल असं काही करु नका”

“सरकारकडून निर्णयांना स्थगिती देण्याची घाई सुरु आहे. आरे कारशेडच्या निर्णयानंतर माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका असं वारंवार मी सांगत आहे. पर्यावरणाचा घात होईल असं काही करु नका. तिकडे झाडांची कत्तल केल्यानंतररही बिबट्यांचा वावर आहे. त्याचा रिपोर्ट माझ्या घरी टेबलावर आहे, तिथे वन्यजीव आहेत. कांजूरच्या ओसाड जागेत केलं तर हीच मेट्रो अधिक लोकसंख्येसाठी वापरता येईल. आज किंवा उद्या यांना कांजूरमध्ये जावं लागणारच आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शरद पवारांनी ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवल्याच्या आरोपांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मग आता जे…”

“तुमच्या हट्टापायी मुंबईचा घात करु नका”

“आरेमध्ये कारशेड करताना कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं असून एवढी जागा वापरणार नाही सांगितलं आहे. पण त्यांना ही जागा वापरावीच लागणार आहे. केवळ तुमच्या हट्टापायी मुंबईचा घात करु नका. मग हे मुंबईच्या बाहेरचे असल्याने यांना मुंबईबद्दल प्रेम नाही असं म्हणावं लागेल. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो, तो केवळ मुंबई, ठाणे किंवा नागपूरचा नसतो. मी मुख्यंत्री असताना जिथे शक्य आहे, तिथे वनं वाढवली आहेत याचं समाधान आहे. मुंबईत ८०० एकर जंगल घोषित केलं आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

स्वत: उद्धव ठाकरे सूरतला गेले असते तर…? उद्धव ठाकरे बंडखोरांसंदर्भातील प्रश्नावर म्हणाले, “माझ्या मनात काही…”

“मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच”

“मुंबई पालिका निवडणुका लवकर जाहीर झाल्या पाहिजेत. मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच आहे. अनेकांनी या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नाही असं म्हटलं होतं. पण आता मुंबईत मुंबईकर म्हणून सगळे एकत्र झाले आहेत. त्यावेळी यांनी हिंदुत्वात मराठी, अमराठी म्हणत फोडण्याचा प्रयत्न केला होता. तेदेखील आता मला येऊन भेटत आहेत. मराठी माणसांमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता, आजसुद्धा करत आहेत, तेही एकवटले आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट पाहत आहेत. फक्त पालिकाच नाही तर विधानसभेच्या निवडणुकाही लवकरात लवकर घ्याव्यात,” असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray saamana interview sanjay raut mumbai bmc election aarey metro carshed sgy