केंद्रामध्ये आणि आता राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या पाठींब्याने सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधकांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे आरोप केले जातात. भाजपाकडून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) माध्यमातून अडकविण्याचा डाव सुरू आहे असे आरोप शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून केला जात आहे. राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापलेलं असतानाच आता औरंगाबादमध्ये भाजपाविरोधात झळकावण्यात आलेलं पोस्टर अनेकांचे लक्ष वेधून घेत असून ते शहरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.
नक्की वाचा >> ईडी कारवाई करणार हे अगोदरच कसं कळतं? खुद्द किरीट सोमय्या यांनीच दिलं उत्तर; म्हणाले…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी शहरातील क्रांती चौकात हे भाजपाविरोधी पोस्टर लावलं आहे. “या देशात ऐतिहासिक बहुमताने भाजपाचं सरकार सत्तेत आलेलं आहे. अनेक राज्यांमध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांचं सरकार आहे. एवढ्यावरही त्यांची भूक भागत नसल्याने ते सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहेत,” अशी टीका अक्षय पाटील यांनी केली आहे. “आज या देशात ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणाचे प्रमुख भाजपाच्या घरगड्यांप्रमाणे वागत आहेत. ईडी ही भाजपाची दुसरी शाखाच झालीय,” असा टोलाही पाटील यांनी लगाला आहे. शहरातील काही प्रमुख चौकांमध्ये आणि मुख्य ठिकाणी पाटील यांनी हे पोस्टर्स लावलेले आहेत.
पाहा व्हिडीओ –
नक्की वाचा >> संजय राऊतांना ‘ईडी’कडून अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी आम्हाला पण तुरुंगात…”
“जे कोणी मला भाजपा नेत्यावर या केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केल्याचं दाखवेल. अथवा भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांवर कारवाई झाल्याचं दाखवून देईल त्या नागरिकाला मी एक लाख रुपये बक्षीस देणार आहे. या संधीचा फायदा घेऊन अशी कारवाई दाखवण्याचा किमान भाजपा कार्यकर्त्यांनी तरी प्रयत्न करावा, असं माझं त्यांना आवाहन आहे,” असं पाटील यांनी प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओत या बॅनर लावण्यामागील संकल्पनेबद्दल सांगितलं आहे.