Shrinivas Pawar on Ajit Pawar Claims Over Family and Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यापासून दोन्ही गटांमधील नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्ये केल्यामुळे, प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे पवार कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, आज अजित पवारांनी पुन्हा एकदा कौटुंबिक गोष्टी जाहीर सभेत बोलून दाखवल्या. अजित पवार यांनी आज (२८ ऑक्टोबर) बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर कन्हेरी येथील प्रचारसभेला संबोधित केलं. या सभेत भाषण करताना ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीवेळी माझी चूक (सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं) झाली, तीच चूक आता वरिष्ठ (शरद पवार) करत आहेत”. त्यावर, अजित पवारांचे थोरले भाऊ श्रीनिवास पवार म्हणाले, “चूक व्हायच्या आधी आम्ही त्यांना सांगत होतो. त्यांनी तेव्हाच ते थांबवायला पाहिजे होतं. आता झालं गेलं ते त्यांनी सोडून द्यायला हवं.

कन्हेरीतील सभेत अजित पवार म्हणाले, “माझ्या आईने सांगितलेलं, माझ्या दादाविरोधात (अजित पवार) अर्ज भरू नका, परंतु, वडीलधाऱ्यांनी (शरद पवार) हे थांबवायला हवं होतं. मात्र, त्यांनी तसं केलं नाही”. यावरून श्रीनिवास पवारांना विचारण्यात आलं की तुमच्या घरात कुटुंबात असं काही संभाषण झालं होतं का? त्यावर श्रीनिवास पवार म्हणाले, “असं संभाषण झालं असेल तर ते मला माहिती नाही. किंबहुना मी तरी अशा संभाषणात नव्हतो आणि आई असं काही म्हणाली असेल असं मला वाटत नाही. कारण युगेंद्र पवार हा तिचा नातू आहे आणि आजीचं नातवावर किती प्रेम असतं हे सगळ्यांना माहित आहे. तसेच, माझी आई राजकारणाच्या गोष्टीत पडत नाही. तिचं वय आता ८६ वर्षे इतकं आहे. तिने आधीही कधी राजकीय गोष्टींमध्ये भाग घेतला नाही. त्यामुळे मला माहिती नाही की असं कुठे बोलणं झालं की नाही. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या घरात अशी काही चर्चा झालेली नाही.

हे ही वाचा >> “मी बारामतीतून निवडणूक लढणार नव्हतो, पण…”, अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “मी नौटंकी…”

…अन् अजित पवारांचा कंठ दाटून आला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “आमच्या पक्षाचं आधीच ठरलं होतं की मी बारामतीतून विधानसभेचा अर्ज भरणार आहे. तात्यासाहेब पवारांचं कुटुंब म्हणजे आमचं कुटुंब अत्यंत बिकट परिस्थितीतून इथवर आलेलं आहे. आई आज सांगत होती, माझ्या दादाविरोधात अर्ज भरू नका”. हे बोलत असताना अजित पवार भावूक झाले होते, त्यांचा कंठ दाटून आला होता, त्यांनी भाषण थांबवलं आणि ते पाणी प्यायले. त्यानंतर ते म्हणाले, “मतदारसंघात जे काही चाललंय ते बरोबर नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींनी (शरद पवार) सांगितलं पाहिजे होतं…”