Shyam Manav : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला निवडणूक आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात ३१ जागा मिळाल्या. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर ८ ऑक्टोबरला हरियाणा विधानसभेची निवडणूक भाजपाने जिंकली आहे त्यामुळे भाजपाचाही आत्मविश्वास वाढला आहे. महाविकास आघाडीला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव ( Shyam Manav ) यांनी लाडकी बहीण योजनेवरुन काही सूचना केल्या आहेत.

काय म्हणाले श्याम मानव?

“मी नागपूरमध्ये कार्यक्रमात येतो आहे म्हटल्यावर काही लोकांनी इथे राडा केला. त्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रभर पोहचला. मी १९८२ मध्ये या कामाला सुरुवात केली तेव्हापासून असेच अनुभव घेतले. आज ४३ वर्षे उलटल्यावरही अशाच प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आहे यात मला आता काही विशेष वाटत नाही.” असं श्याम मानव ( Shyam Manav ) यांनी म्हटलं आहे.

मोदींनी पेट्रोलचे दर वाढवून महागाई लादली

मोदींनी पेट्रोलचे दर वाढवून वाढवून आपल्यावर महागाई लादली. साधारण १६ लाख कोटी रुपये भांडवलदारांचे माफ केले. या लोकांनी शेठजींचं राज्य निर्माण केलं आहे असाही आरोप मानव यांनी केला. महाराष्ट्रातलं जे सरकार आहे त्याला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार म्हटलं जातं. या सरकारमध्ये मुख्यमंत्री दिसतात एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री दिसतात अजित पवार. मी खात्रीने सांगतो आहे दोघांचं फारसं चालत नाही. देवाभाऊंचं सगळं ऐकलं जातं. असं श्याम मानव ( Shyam Manav ) म्हणाले

महायुतीचं सरकार कसं आलं?

महायुतीचं सरकार कसं आलं ते तुम्हाला सांगतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्या सरकारमधून उद्धव ठाकरेंच्या पक्षातली काही माणसं २१ जूनला सुरतला गेली. त्यानंतर गुवाहाटीला लोक गेले. त्यानंतर गोव्याला गेले. त्यानंतर ३० जूनला विद्वान राज्यपालांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या सरकारमध्ये सहभागी झालेले माझे एक मित्रही होते. त्यांचं पहिलं वाक्य होतं आता लोकशाही उरलेली नाही. मी गुवाहाटीला गेलो होतो. गेल्या गेल्या आमचे फोन काढून घेतले होते. कुणाशीही आम्ही संपर्क साधू शकत नव्हतो. हे सगळे पहारे असताना आम्हाला रोज टेलिकॉन्फरन्सिंगवरुन दिल्लीतले लोक बोलायचे. त्यांनी आम्हाला तेव्हाच सांगितलं होतं की आता आपलं सरकार येणार आहे आणि ते अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. आधीच सगळं ठरलं आहे, सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट सगळं काही ठरलेलं आहे. उपाध्यक्षांना काहीही निर्णय घ्यायचा नाही हे सांगितलं आहे. मी हे आज सांगत नाही आधीही सांगितलं होतं. मी उद्धव ठाकरेंच्या समोर सांगितलं होतं की कोर्टाचे निर्णय काहीही आले तरीही सरकार सुरु राहणार आहे. असंही श्याम मानव ( Shyam Manav ) म्हणाले.

हे पण वाचा नागपूर : श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजयुमो कार्यकर्त्यांच्या घोषणा आणि गोंधळ, काय घडले?

लाडकी बहीण योजनेवरुन मविआला सल्ला

लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जात आहे. हा मुद्दा महाविकास आघाडीने हलक्यात घेऊ नये. लाडकी बहीण योजनेचं कौतुक करा. हे सांगा की लाडक्या बहिणी आम्हाला अधिक लाडक्या आहेत. कारण ज्या महिलांना पैसे मिळत आहेत त्यातल्या ४० टक्के महिला गृहिणी आहेत. त्यांच्यासाठी महिन्याला मिळणारे १५०० रुपये फार महत्त्वाचे आहेत. सतत नवरा, मुलांपुढे हात पसरावा लागतो, त्याऐवजी माझ्या नावावर सरकार माझ्यासाठी पैसे पाठवत आहे हा महिलांसाठी फक्त सन्मानाचा नाही तर अभिमानाचा विषय आहे. उद्धव ठाकरेंशी माझी चर्चा झाली आहे. हा पैसे वाया जात नाही. मोदींनी १६ लाख कोटींचं कर्ज माफ केलं तो पैसा वाया गेला. आता जे पैसे महिलांच्या खात्यात जात आहेत त्याचं गणित सांगतो. लोककल्याणकारी सरकार क्रयशक्ती वाढवणाऱ्या योजना आणत असतं. लाडकी बहीण योजना तशीच आहे. यामुळे स्त्रियांची क्रयशक्ती वाढणार आहे. स्त्रियांची क्रयशक्ती वाढली की त्या कुटुंबासाठी खर्च करतील. भाजी विकत घेतील, कपडे घेतील. या स्त्रिया ऑनलाईनवरुन काही मागवणार नाहीत. पण यामुळे छोट्या उद्योगांना चालना मिळणार आहे हे लक्षात घेऊन आणललेलं हे स्तुत्य पाऊल आहे. त्यामुळे मविआने समर्थन केलं पाहिजे. लोकांना काम मिळण्याची शक्यता आहे, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल त्यामुळे लाडकी बहीण योजना उपयुक्त गुंतवणूक आहे असं मानलं पाहिजे असं श्याम मानव ( Shyam Manav ) म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजनेचं कौतुक करा आणि या बाबांना (महायुती सरकार) हाकलायचं आवाहन महिलांना करा असंही श्याम मानव ( Shyam Manav ) म्हणाले.