Shyam Manav News: महाराष्ट्रातलं सरकार हे शेठजी आणि भटजीचं सरकार आहे. शेठजीची संपत्ती वाढवणारं आणि गरिबांना गरीब बनवणारं हे सरकार आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी म्हटलं आहे. नागपुरात पुरोगामी सामाजिक संघटनांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात Shyam Manav यांनी हे वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रातलं सरकार फोडाफोडी करुन कसं आलं माहीत आहेच
“महाराष्ट्रातलं हे सरकार कसं आलं ते सगळ्यांना माहीत आहे. सरळपणे एवढे खोके घ्या, मंत्रिपदं घ्या, तुमचा पक्ष फोडा आणि आमच्याकडे या नाहीतर तुरुंगात जा. या पद्धतीने हे सरकार आलं आहे. गुवाहाटीतून परत आलेल्या माझ्या मित्राला मी सांगितलं. माझ्या त्या मित्राला मी म्हटलं की पाच दहा लोकं ईडी-सीबीआयच्या भीतीने फुटले असतील. तर तो मला म्हणाला तुम्हाला ठाऊक नाही ४० च्या ४० आमदारांची कागदपत्रं तयार आहेत. अशा पद्धतीने फोडाफोडी करुन हे सरकार आलं. मी त्या मित्राला हे पण म्हटलं की असं जर त्यांनी केलं तर त्यांच्यावर कोर्टाची कारवाई होईल. त्यावर तो मित्र मला म्हणाला सगळे निर्णय त्यांच्या बाजूने येणार आणि सरकार अडीच वर्षे चालणार हे आधीच ठरलं आहे.” असं Shyam Manav त्यांच्या भाषणात म्हणाले.
हे पण वाचा- Shyam Manav : “श्याम मानव लवकरच तुतारी गटात जाणार”, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा; म्हणाले, “विधानसभेला…”
सध्या आश्वासक चेहरे फक्त तीनच
अनिल देशमुख यांचे ईडी प्रकरणाच्या मुद्द्यावरून बुधवारी श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर फडणवीस यांनी श्याम मानव यांच्या वक्तव्याला उत्तर देताना हे ही सुपारीबाजाच्या नादी लागले का असं खोचक प्रश्न विचारला होता? फडणवीसांच्या वक्तव्याच्या काही तासानंतर श्याम मानव यांनी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. तसंच “महाराष्ट्रातलं सरकार हे शेठजी आणि भटजी यांचं सरकार आहे. आत्ताच्या घडीला सर्वात आश्वासक चेहरे आहेत ते म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचे. मोदी सरकार आल्यानंतर फक्त मनमानी झाली आहे. बाकी काहीही झालेलं नाही. जे त्यांच्या विरोधात बोलतात त्यांना तुरुंगात डांबलं आहे. घटनेची पायमल्ली करणारं हे सरकार आहे. असंही Shyam Manav म्हणाले.
जे काही घडलं ते आपण पाहतो आहोतच
“महाराष्ट्रात जी काही फोडाफोडी झाली त्यानंतर मला माझे मित्र असीम सरोदेही सांगत होते की सरकार कोसळणार आहे, मी त्याला सांगितलं की हे सरकार अडीच वर्षे चालणार आहे. तेच घडताना आपण पाहतो आहोत.” असंही श्याम मानव यांनी म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd