तानाजी काळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंदापूर : ऐन हिवाळय़ातच उजनी धरणाच्या जलपातळीत मोठी घट झाली असून, धरणातील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर आला आहे. सध्या उजनीमध्ये केवळ १८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी चलसाठय़ात असून, याच पद्धतीने पाण्याचा वापर झाला तर जानेवारी महिन्यातच धरण कोरडे होण्याची भीती व्यक्त होत आहे. आगामी दुष्काळाची दाहकता वेळीच ओळखून उपलब्ध पाण्याचे जबाबदारीने नियोजन न झाल्यास मोठय़ा गंभीर पाणीसमस्येला तोंड द्यावे लागेल, असे चित्र आता स्पष्ट दिसत आहे.

या वर्षी उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाळय़ात सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. परतीच्या पावसात उजनीमध्ये केवळ ६० टक्के पाणीसाठा जमा झाला. यातूनच रब्बी हंगामाचे आवर्तन आणि भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्याबरोबरच कार्तिकी एकादशीनिमित्त नदीपात्रातून पंढरपूरला पाणी सोडण्यात आल्यामुळे या आठवडय़ात पाणी साठय़ात कमालीची घट होत तो ३५ टक्क्यांवर आला आहे.

हेही वाचा >>>”अजित पवारांनी कधी पक्षाचं पद उपभोगलं आहे का?” जितेंद्र आव्हाड म्हणाले, ”पक्ष वाढवण्यात शरद पवारांनी….”

मागील पावसाळय़ात उजनी धरण शंभर टक्के भरले होते. उजनीच्या पाणलोट आणि लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापर्यंत उजनी धरण काठोकाठ भरले होते.  शंभर टक्के पाणीसाठा जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत उपलब्ध होता. मात्र, जानेवारीनंतर उजनीच्या पाण्याचा वापर मोठय़ा प्रमाणामध्ये सुरू झाल्याने उन्हाळा अखेपर्यंत उजनी धरण शंभर टक्के रिक्त होऊन मृतसाठय़ातीलही ३६ टक्के पाणी वापरात आल्याने धरण मोकळे झाले होते. अशातच पावसाने दडी मारल्यामुळे उजनी धरणामध्ये उशिराने पाणी साठण्यास प्रारंभ झाला. मात्र, पाणीसाठा पूर्ववत होत बराच अवधी लागल्याने उजनी धरण केवळ ६० टक्केच भरले. यामधून २५ टक्के पाणी दीड महिन्यात वापरात आल्याने आगामी हिवाळा आणि पुढील वर्षीचा भीषण उन्हाळा ३५ टक्के पाण्यामध्ये निभावणार का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. 

उजनीच्या पाण्याचा सुरुवातीपासूनच मोठा वापर सुरू झाला असल्याने दुष्काळाच्या खाईत उजनी धरणावर अवलंबून असलेल्या लोकांची वणवण सुरू झाल्यानंतर ऐनवेळी शासन नेमकी कोणती उपाययोजना करणार? याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. २० वर्षांपूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळात खडकवासला धरणातून दहा टीएमसी पाणी उजनी धरणामध्ये सोडण्यात आले होते. मात्र, सध्या खडकवासला धरणावर अवलंबून असलेल्या शेतीच्या पाण्याच्या आवर्तनातच मोठी तफावत आढळून येत असून, पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा दररोज वाढत असून, या पुढच्या काळामध्ये खडकवासला धरणाचे पाणी शेतीसाठी आणि ऐनवेळी उजनी धरणामध्ये सोडण्यासाठी कितपत मिळू शकेल, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

उजनी धरणाच्या पाण्याची स्थिती हाताबाहेर जाण्याअगोदरच पाण्याच्या वापराबाबत अत्यंत जबाबदारी घेऊन काटेकोरपणे पाणी वापरण्याची वेळ आलेली असताना बेसुमार पाण्याचा वापर या बिकट परिस्थितीमध्ये परवडण्यासारखा नसून, उजनीच्या पाण्यावर पाणलोट क्षेत्रातील मोठय़ा प्रमाणावर शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. अनेक सहकारी साखर कारखाने, खासगी कारखाने, औद्योगिक वसाहतींनाही उजनीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याने उजनीच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन होणे गरजेचे आहे, अशी जनभावना आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Since ujani dam is at 35 percent in winter itself there is a need for strict planning amy