सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा समुद्र किनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांचे पर्यावरणप्रेमी कासव मित्र सूर्यकांत धुरी यांनी संवर्धन केले होते . ती कासवाची ११० पिल्ले अंगणवाडीतील मुलांच्या हस्ते समुद्री अधिवासात सोडण्यात आली आहेत .आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
यावेळी कांदळगाव येथील वनरशक संजीव जाधव, सूर्यकांत धुरी, नितांत कुबल, केशव कुबल, पोलीस पाटील तन्वी जोशी, जगन्नाथ जोशी, पिरावाडी येथील अंगणवाडी मदतनीस श्रावी परडकर,सृष्टी धुरी, पिरावाडी येथील अंगणवाडी चे बाल विध्यार्थी उपस्थित होते.
सुर्यकांत धुरी यांनी सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करत बुधवारी ५१ दिवसांनी त्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या ११० पिल्लांची बॅच आचरा समुद्रात सोडली. आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती या वर्षाच्या सुरुवाती पासून कासव संवर्धनास वेग आला असून तब्ब्ल २८ घरटी आचरा किनाऱ्यावर तयार करण्यात आली आहेत. यातील या बॅच टप्प्या टप्प्याने समुद्रात सोडण्यात येणार आहे. ही कसवाची अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली दोन महिन्यांपूर्वीपासून समुद्र किनारी संरक्षित करण्याचे काम कासव मित्रांनी हाती घेतले होते.
आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात
अॕलिव्ह रिडले ह्या कासव जमातीची कासवे या किनाऱ्यास पसंती देताना दिसत आहेत. आचरा ते तळाशील कासवांच्या अंडी घालण्याचा किनारा म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जाऊ लागला आहे. या भागातील ग्रामस्थ ही अंडी सुरक्षित ठेऊन अन्य हिंस्त्र प्राण्यां पासून त्यांचे जतन करत आहेत.