महाराष्ट्र शासनाने काजू अनुदान मिळण्यासाठी मागणी अर्ज जमा करण्यासाठी दिलेली अंतिम तारीख ३१ ऑगस्ट ही निघून गेली. मात्र यासाठी आवश्यक असणारे शासनाने प्रसिद्ध केलेले अनुदान मागणीचे विहित अर्ज शासनाच्या कोणत्याही संबधित खात्याकडून अथवा काजू बोर्डाकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत किंवा ते अर्ज स्वीकारण्याची यंत्रणाच अद्याप कार्यान्वित नाही, असे बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी म्हटले आहे.

चतुर्थीच्या सणासुदीला आपले हक्काचे काजू अनुदानाचे पैसे मिळतील या भाबड्या आशेने असणारे शेतकरी हवालदिल, निराश आणि हतबल झाले आहेत. या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार संपर्क साधून अनुदानासंदर्भात लेखी निवेदन दिले होते परंतु आश्वासनाव्यतिरिक्त एकही शब्द पाळला नाही किंवा दिलासादायक वक्तव्य केले नाही.

हेही वाचा – सातारा : कोयना धरणात यंदा आजवर १४१ अब्ज घनफूट जल आवक, वार्षिक सरासरीच्या ११० टक्के पाऊस

हेही वाचा – Sharad Kelkar : “छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणं वेदनादायी”, अभिनेता शरद केळकरची हळहळ; म्हणाला,” या गोष्टीचं राजकारण…”

यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी बांदा येथे सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनीच्या ऑफिसमध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण सर्वांनी सदर बैठकीस वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष विलास सावंत यांनी केले आहे.