Dharavi Masjit Conflict : मुंबईतल्या धारावीत तणाव निर्माण झाला आहे. मशिदीची बेकायदेशीर भाग तोडण्यावरुन वाद सुरु झाला. हा भाग तोडण्यासाठी जी महापालिकेची गाडी गेली त्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. तसंच या भागात जमाव एकवटला. यावरून ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. हिंदू मुस्लीम दंगे घडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. सिनेट निवडणुकीबाबत माहिती देण्याकरता आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, “धारावीचा प्रश्न गंभीर आहे. गेल्या एक-दीड वर्षांपासून अदाणी समूह धारावीत आलं आहे आणि मुंबई लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हापासून धारावीची आणि महाराष्ट्राची एकजूट झालेली आहे, त्या एकजुटीला तोडण्यासाठी हिंदू-मुस्लीम दंगली घडवण्याचा शेवटचा प्रयत्न सुरू आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> Dharavi Masjid : धारावीत मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाडीची तोडफोड, शेकडो मुस्लिमांचा जमाव एकवटला

अडीच वर्षांच्या काळात एकही दंगल घडली नव्हती

“संपूर्ण धारावीचं पुनर्वसन होणार आहे. तरीही या कारवाया करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अदाणी समूहाच्या घशात मुंबई जावी आणि राज्य यांच्या हातात राहावं आणि अदाणीला राज्य विकू शकतात. हिंदू मुस्लीम दंगली झाल्या तरच असं होऊ शकतं. त्यामुळे भाजपाचा हा शेवटचा प्रयत्न आहे. आमच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये अशी एकही घटना घडली नव्हती. खांद्याला खांदा लावून उभे राहतात. हिंदू मुस्लीम वाद, जातीचे वाद ते नाही जमलं तर भारत पाकिस्तान वाद केले जातात. आपल्याकडून या वादात अडकवून ठेवतात आणि यांची मुलं परदेशी राहायला, कामाला आहेत”, अशीही टीका आदित्य ठाकरेंनी केली.