सोलापूर : जूनमध्ये मृग नक्षत्राच्या दमदार पावसामुळे उजनी धरणात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली खरी; परंतु गेल्या दीड महिन्यात पावसाळा सुरू होऊनसुद्धा धरण अद्याप वजा पातळीतच राहिले आहे. वजा पातळीतून बाहेर येण्यासाठी आणखी १० टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. तर धरण शंभर टक्के भरण्यासाठी तब्बल ७० टीएमसी पाणीसाठ्यापर्यंत मजल गाठावी लागणार आहे. सुदैवाने गेल्या तीन-चार दिवसांपासून उजनीच्या वरच्या भागात, सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात थंडावलेल्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे उजनी धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. बुधवारी दुपारी दौंड येथून उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग २१ हजारांपेक्षा जास्त होता. उद्या गुरुवारी पाण्याची आवक ४० हजार क्युसेकपर्यंत वाढण्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे.

उजनीच्या वरच्या भागातील लहानमोठी १९ धरणे भरल्यानंतर उजनी धरणात पाणीसाठा वाढणार आहे. त्यादृष्टीने पुढील महिनाभरात पुणे जिल्ह्यातील मोठ्या पावसावर उजनीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. चार दिवसांपूर्वी उजनीच्या वरच्या भागातील मुक्त लाभक्षेत्रातूनच उजनी धरणाची संथगतीने उपयुक्त पातळीकडे वाटचाल सुरू होती. परंतु नंतर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आणि भीमा खोऱ्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्याचा फायदा इकडे उजनी धरण वधारण्यासाठी होत आहे. बुधवारी सकाळी उजनी धरणात एकूण ५३.७३ टीएमसी पाणीसाठा तर उपयुक्त पाणीसाठा वजा ९.८३ टीएमसी इतका होता. तर त्याची टक्केवारी १८.५३ एवढी होती. म्हणजे धरण वजा पातळीतून बाहेर पडून उपयुक्त पातळीत येण्यासाठी आणखी ९.८३ टीएमसी पाण्याची गरज अहे. मागील दहा दिवसांत धरणात १४.९९ टक्के म्हणजे ८.०३ टीएमसी पाणीसाठा वधारला आहे. एकूण १२३ टीएमसी क्षमतेच्या उजनी धरणात ६३ टीएमसी पाणीसाठा वजा पातळीत धरला जातो. म्हणजेच यातून काटकसरीने पाणी वापराबद्दल धोक्याचा इशारा मानला जातो.

हेही वाचा – धाराशिव : लाचखोर वैद्यकीय अधिकारी गजाआड, सहकाऱ्याची बिले काढण्यासाठी घेतली तीन हजाराची लाच

गतवर्षी अपुऱ्या पाऊसमानामुळे उजनी धरण ६६ टक्क्यांपर्यंतच भरले होते. परंतु त्याबाबतचे भान न ठेवता राजकीय दांडगाईमुळे धरणाच्या पाणी वाटपात नियोजनाचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे धरण वजा ६० टक्क्यांपर्यंत पार रसातळाला गेले होते. सुदैवाने यंदाच्या वर्षी समाधानकारक म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे उजनी धरण झपाट्याने भरण्याच्या अनुषंगाने सोलापूरकरांच्या आशा उंचावल्या आहेत. त्यानुसार सुरुवातीला जूनमध्ये मृग नक्षत्रातच पावसामुळे धरणात पाणीसाठा वधारू लागला. नंतर पाऊस थंडावला. एकीकडे पावसाळा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्या-नाले दुथडी भरून वाहात असून काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. परंतु दुसरीकडे उजनी धरणाच्या वरच्या भागात भीमा खोऱ्यात तुलनेने पावसाचे प्रमाण कमीच होते. परिणामी, पुणे जिल्ह्यातील धरणांची स्थितीही तेवढी समाधानकारक नव्हती.

हेही वाचा – धाराशिव : लाचखोर वैद्यकीय अधिकारी गजाआड, सहकाऱ्याची बिले काढण्यासाठी घेतली तीन हजाराची लाच

कळमोडी, वडिवळे, कासारसाई, पानशेत, खडकवासला आदी मोजक्या धरणांचा अपवाद वगळता अन्य धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या खालीच होता. पुणे जिल्ह्यात राखी पौर्णिमेनंतर पावसाचे प्रमाण घटते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात पुणे जिल्ह्यात मोठा पाऊस झाला तरच त्यातून उजनी धरणात पाणीसाठा वाढणार आहे. धरण शंभर टक्के भरण्यासाठी आणखी ७० टीएमसी पाणीसाठ्यापर्यंत मजल गाठायची आहे. त्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील मोठ्या पावसावरच उजनीचे भवितव्य अवलंबून असताना अखेर सुदैवाने दौंड येथून उजनी धरणात पाणी प्रचंड प्रमाणात मिसळत आहे. दौंड येथून २१ हजार क्युसेक तर बंडगार्डन येथून २६ हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे. कळमोडीतून इंद्रायणी नदीत सोडलेल्या पाच हजार क्युसेक विसर्गाचा पाण्याचा प्रवाह भीमा नदीवाटे उजनी धरणात मिसळणार आहे. कासारसाई धरणातूनही पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होत असताना दुसरीकडे लोणावळा भागात एकाच रात्रीत २७५ मिलीमीटर इतका मुसळधार पाऊस पडल्यामुळे उजनी धरण भरण्याबाबत आशा उंचावली आहे.